Pandharpur Vitthal Temple: पंढरपूरातील विठुरायाला चैत्र एकादशीच्या दिवशी अर्पण करण्यात आलेल्या पुरणपोळी नैवेद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे ही परंपरा असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे असताना, वारकरी साहित्य परिषदेने या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चैत्र एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक उपवास करून विठुरायाचे दर्शन घेतात. या दिवशी विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एकादशीच्या दिवशी उपवासाचे विशेष महत्त्व असते. अशा दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणे म्हणजे एकादशी व्रताच्या तत्वांना विरोध करणारे आहे. “देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा भक्तांच्या आचारसंहितेशी सुसंगत असावा,” असेही त्यांनी नमूद केले.
विठ्ठल पाटील महाराज यांनी मंदिर समितीकडे या प्रथेबाबत लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, पोथ्या-पुराणातील संदर्भ देऊन अशा प्रकारचे कर्मकांड राबवणे योग्य नाही. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, चैत्र एकादशीला विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या प्रथेनुसारच यंदाही नैवेद्य दाखवण्यात आला असून, यात कोणतीही नवीन गोष्ट नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक श्रद्धा आणि परंपरा यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हा वाद पुढे आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.