भूषण अहिरे, साम टीव्ही
शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख ८४ हजार दोनशे रुपयांची रोकड सापडल्याने प्रशासनात आणि राजकारणात खळबळ उडाली आहे. ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर गेल्या चार-पाच दिवसांपासून बुक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धुळ्यातील विश्रामगृहात खोली क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख ८४ हजार दोनशे रूपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही खोली जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने गेल्या ४-५ दिवसांपासून बुक करण्यात आली होती. याची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर विकासकामांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या, आणि या त्रुटी झाकण्यासाठी शासकीय कार्यालयांमधून कोट्यवधी रुपयांची रोकड या ठिकाणी पोहोचवण्यात आली', असा त्यांनी आरोप लावला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, "ही रोकड विधिमंडळ अंदाज समितीच्या ११ आमदारांना देण्यासाठी आणली होती", असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.
अनिल गोटे यांना माहिती मिळताच त्यांनी १० वाजल्यापासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर १०२ च्या बाहेर आपला ठिय्या मांडला होता. या ठिकाणी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, तरीही कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप गोटे यांनी केला आहे. तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह याठिकाणी दाखल झाले. दाखल होताच त्यांनी जवळपास एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भात चौकशी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
चौकशी करत पोलिसांनी रूम नंबर १०२ मधील पैसे मोजले. परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा नसल्याचं त्यांनी सांगितलं. तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, या संदर्भात चौकशीनंतर काय गौडबंगाल समोर येणार आहे, ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठं घबाड सापडल्यानंतर संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया देत अनिल गोटेंचं कौतुक केलं आहे, 'गोटे साहेब आणि शिवसैनिक चार ते पाच तास शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ठिय्या मांडून बसले होते, तरीही पोलीस आणि जिल्हाधिकारी तिथे आले नाहीत. हे अत्यंत धक्कादायक असून, हे दाखवते की, सरकारी यंत्रणा कधीही जनतेच्या हितासाठी कारवाई करत नाही. पाच लाखाच्या आरोपांवर वेगवेगळ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणारी यंत्रणा, या मोठ्या प्रकरणात कशी गप्प बसली?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.