अहमदनगर : एसटी बस आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करतोय हे उघड आहे. ज्यांनी एअर इंडिया (Air India) विकली, आता रेल्वे (Railway) विकायला निघालेत त्यांना एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही. अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे. एसटी कामगारांच्या समस्यांचे निवारण महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेले आहे. अजूनही आमचे परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करतायेत. एसटी कमर्चाऱ्यांच्या समस्यांबाबत अनिल परब नक्कीच काही तरी मार्ग काढतील असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या तळेगाव येथील कार्यक्रमात व्यक्त केलाय.
हे देखील पहा :
काल तळेगाव येथे मोदी सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेतले त्याबद्दल शेतकऱ्यांच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने 'शेतकरी विजय दिवस' साजरा करून, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला या वेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी आमदार सुधीर तांबेसह, शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे थोरात म्हणाले आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात अगोदर टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या देशाच्या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. थोरात म्हणाले, आता एक नवीन नटी आली आहे. ती नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असते, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखोंनी प्राणांची आहुती दिली आहे, बलिदान केले आहे. या स्वातंत्र्याबाबत बोलायची कंगना राणावतची लायकी तरी आहे का? आज ती स्वातंत्र्यावर बोललीय उद्या राज्यघटनेवर बोलेल. मात्र, आजकाल असे वादग्रस्त बोलतात त्यांना लगेच संरक्षण आणि पद्मश्री मिळतो, असा निशाणा थोरात यांनी केंद्र सरकारवर साधला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.