६ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक दावा केला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्री तब्बल १५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स दिला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे..
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पैशांचा मोठा गैरव्यवहार आणि घोडेबाजार सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी पोस्टमध्ये नक्की काय म्हटले आहे?
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया एक्स अकाउंटवर पोस्ट लिहिली. "अपना सपना मनी मनी... महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्री १५ कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि संतापजनक आहे."
येत्या १९ जून रोजी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा वर्धापन दिन असून, या दिवशी मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ठाकरेंच्या ६ खासदारांचा जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काल रात्रीपासूनच या खासदारांच्या दिल्ली वाऱ्या आणि 'नॉट रिचेबल' असण्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच आता संजय राऊत यांनी थेट "१५ कोटींच्या अॅडव्हान्स"चा आकडा जाहीर केल्यामुळे या संपूर्ण घडामोडींमागे मोठा आर्थिक व्यवहार असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.