अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
'मी त्याच विमानातून ४-५ वेळा प्रवास केला होता', असे मुख्यमंत्री म्हणाले
विमान अपघाताला २५ दिवस पूर्ण झाले तरी कारण समोर आले नाही
DGCA आणि केंद्रीय यंत्रणांकडून १३ निकषांवर चौकशी सुरू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन २५ दिवस पूर्ण झाले. तरी देखील हा अपघात नेमका कशामुळे झाला होता यामागचे कारण समोर आले नाही. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत मोठं विधान केले. 'अजित पवारांच्या ज्या विमानाला अपघात झाला. त्या विमानातून मी ४-५ वेळा प्रवास केला होता,', असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'अजित पवार यांच्या मृत्यूने सर्वांनाच दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय दुःखी आहेत. होत असलेल्या आरोपांची चौकशी आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि केंद्रीय गुप्तचर संस्था करत आहेत. केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अजित पवार यांचे जे विमान कोसळले त्या विमानातून मी चार-पाच वेळा प्रवास केला होता.'
मुख्यमंत्री फडणवीसांनी या विमान अपघाताच्या चौकशीबाबत असे देखील सांगितले की, 'डीजी सेफ्टीकडून १३ पॅरामीटर्सवर चौकशी सुरू झाली आहे. सर्व डेटा उपलब्ध असेल. परदेशी एजन्सींचा शोध घेतला जात आहे. डीजीसीए व्हीएसआर कंपनीचे ऑडिट करत आहे. चौकशी अहवालाची वाट पाहावी लागेल. या चौकशीबद्दल कोणाला काही शंका असेल तर त्यांनी डीजीसीए किंवा आम्हाला कळवावे.'
आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, 'या अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार आहेत. मी ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करेन. अजितदादांनी अर्थसंकल्पावर खूप मेहनत घेतली पण ते आज नाहीत. जर एखादी योजना शक्य नसती तर त्यांनी ती स्पष्टपणे सांगितली असती. अजित पवारांनी कधीही अनुशासनहीन प्रशासन सहन केले नाही आणि आम्ही त्यांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करू.'