सचिन कदम, साम टीव्ही
एकीकडे देश डिजिटल क्रांती आणि महासत्तेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीत विकासाचा बोजवारा उडावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्याची आठ दशके उलटूनही मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना कसा यातनादायी प्रवास करावा लागतो याचे विदारक चित्र खोपोलीत पाहायला मिळाले. रस्ताच नसल्याने थेट कमरेइतक्या पाण्यातून नदी ओलांडून अंत्ययात्रा काढावी लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणाऱ्या मेळगांव परिसरात ठाकुरवाडी आणि कातकरवाडी अशी एक गाव आणि दोन वाड्या आहेत. त्यामुळे गावात कोणाचा मृत्यू झाल्यास स्माशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी कंबरेभर वाहत्या पाण्यातून थेट नदी ओलांडूनच जावे लागते. या धोकादायक आणि वेदनादायी अंत्ययात्रेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मेळगाव आणि ठाकूरवाडीतील ग्रामस्थांना अंत्ययात्रेसाठी या नदी पात्राचा वापर करावा लागला असला तरी कातरकारवाडीतील राहिवाशांची परिस्थिती अधिकच भयावह आहे. रस्ता नसल्याने कातकरवाडीतील महिला, बालके आणि ज्येष्ठ लोकांना रोजच्या कामासाठी, बाजारात जाण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी याच धोकादायक नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास या वाड्यांचा इतर गावांशी संपर्क तुटतो.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी ही बिकट परिस्थिती मान्य केली आहे. पावसाळा संपताच तातडीने या भागांमधील रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.