सध्या कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. सकाळच्या १० वाजताच डोक्यावर सुर्य आलेला दिसतो. त्यामुळे प्रचंड घाम येतो. त्यात महिलांना कामानिमित्त बराचवेळ घराबाहेर राहावं लागतं. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे घरी राहून कुटुंब चालवणं सगळ्यांनाच शक्य नाही. त्यात वाढत्या खर्चामुळे बऱ्याच महिलांना घराबाहेर पडून काम करावं लागतं. यासगळ्यात महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि भविष्यात त्यांना काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
वाढत्या उन्हाच्या त्रासामुळे अनेकांना डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: महिलांना या समस्येचा धोका जास्त असतो. कामात व्यस्त असताना त्यांचं पाणी पिण्याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनसोबत थकवा, डोकेदुखी, चिडचिड वाढणे आणि एकाग्रता कमी होणे अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पुढे महिलांसाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत. ज्याचा वापर करुन तुम्ही उन्हाळ्यात हेल्दी राहू शकता.
सगळ्यात आधी सकाळी काही खाण्यापुर्वी १ ग्लास पाणी प्या. त्याने तुमचं शरीर अॅक्टीव्ह होतं. तसेच पचनक्रियासुद्धा सुरळीत चालते. त्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही लिंबाचा रस, तुळशीची पाने यांचा समावेश करु शकता.
जर तुम्हाला पाणी प्यायचं लक्षात राहत नसेल तर तुम्ही मोबाइलवर अलार्म लावू शकता. तसेच काही डिजिटल अॅप्सचा वापर करुन पाणी पित राहू शकता. तसेच पाण्याची बाटली नेहमीसोबत ठेवा. जर प्रवासात कुठे थांबलात तर पाणी पित राहा. याने तुमच्या स्कीनलाही मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. एकाचवेळी जास्त पाणी पिणं गरजेचं नाही. तुम्ही थोड्या थोड्या अंतराने पाणी पित राहू शकता.
तुम्हाला हायड्रेट राहण्यासाठी काही पदार्थ खाणं खूप फायदेशीर ठरु शकतं. कारण फळं, भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रोजच्या आहारात कलिंगड, काकडी, संत्री आणि दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.