बौद्ध साहित्याच्या मते भगवान बुद्ध यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असे मानले जाते. संस्कृतमध्ये याचा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' असा होतो. परिनिर्वाण ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या जीवनातला संघर्ष, कर्मबंधने आणि जन्म-मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्त होतो. याच संदर्भातून भारतात दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरी केली जाते.
२०२५ मध्ये बाबासाहेबांच्या ७०व्या पुण्यतिथीचे वर्ष असून देशभरात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. १९५६ मध्ये याच दिवशी बाबासाहेबांचे निधन झाले. त्याच वर्षी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. जातिभेदाच्या रूढी, असमानता आणि भेदभावामुळे ते अत्यंत चिंतेत आणि दु:खी झाले होते आणि बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून त्यांनी समाजासाठी समानतेचा नवीन मार्ग दाखवला.
बौद्ध धर्मातील परिनिर्वाण ही अत्यंत पवित्र आणि कठीण अवस्था मानली जाते. सदाचारी आणि धर्मपरायण जीवन जगणाऱ्या व्यक्तीलाच निर्वाण प्राप्त करता येते. भगवान बुद्धांनी ८० व्या वर्षी ही अवस्था प्राप्त केल्याचे मानले जाते. याच अर्थाने अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही सदाचारी, समाजाच्या हितकारी कार्यामुळे निर्वाण प्राप्त मानतात. म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस ही असे म्हटले जाते.
या दिवशी देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतात. त्यांच्या मूर्तीवर पुष्पहार अर्पण केले जातात, दीपज्योती पेटवल्या जातात आणि विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांच्या विचारांना, सामाजिक न्यायाच्या लढ्याला आणि परिवर्तनाच्या वारशाला पुनःस्मरण करण्याचा हा दिवस असतो.
डॉ. आंबेडकर हे आपल्या काळातील सर्वाधिक सुशिक्षित आणि विद्वान व्यक्तींमध्ये मानले जातात. त्यांच्या नावावर तब्बल ३२ पदव्या होत्या. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये ते एकमेव दलित विद्यार्थी होते. नंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एमए व पीएचडी, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी व डीएससी पदव्या मिळवल्या. त्यांनी ग्रेज-इन संस्थेतून बॅरिस्टर-एट-लॉची पदवीही घेतली.
बाबासाहेबांना वाचनाची अफाट आवड होती. १९३८ पर्यंत त्यांच्या वैयक्तिक संग्रहात ८,००० पुस्तके होती आणि मृत्युसमयी हा आकडा ३५,००० वर पोहोचला होता. त्यांच्या कुटुंबातील १४ मुलांपैकी शैक्षणिक संधी केवळ त्यांनाच मिळाली. दलित मुलांना शाळेत प्रवेश मिळणे कठीण असतानाही वडिलांच्या सैनिकी सेवेमुळे त्यांना शिक्षणाचा मार्ग उपलब्ध झाला. शाळेत त्यांना इतरांपेक्षा कमी अधिकार मिळत. त्यांना वेगळे बसवले जात आणि पाणीही स्वतः घेण्याची परवानगी नव्हती. त्यांचे आडनाव मूळतः अंबावडेकर होते. शाळेतील एका शिक्षकाने त्यांचे नाव बदलून आंबेडकर असे नोंदवले आणि तेच पुढे त्यांचे अधिकृत नाव बनले. बालविवाह प्रथेमुळे १९०६ साली केवळ १५ वर्षांच्या वयात त्यांचे लग्न ९ वर्षांच्या रमाबाई यांच्याशी झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.