देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळा सुरू झाला की, उन्हाच्या कडक झळांपासून दिलासा मिळतो. मात्र हा ऋतू हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी काही अडचणीही घेऊन येतो. हवेत वाढलेला ओलावा, तापमानातील अचानक होणारे बदल आणि इन्फेक्शनचा वाढलेला धोका याचा थेट परिणाम हृदयावर होऊ शकतो.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, हृदयातील ब्लॉकेज, हृदयाच्या ठोक्यांतील अनियमितता यांसारख्या समस्या आहेत किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी तसंच बायपास शस्त्रक्रिया झालीये त्यांनी पावसाळ्यात अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.
मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे हृदयरोगतज्ज्ञ आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी पावसाळ्यात हार्ट अटॅकच्या रुग्णांनी पाळाव्यात अशा काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
हार्ट अटॅकच्या उपचारांमध्ये औषधांचा नियमित वापर सर्वात महत्त्वाचा असतो. अनेकदा तब्येत ठीक वाटू लागली की, काही जण स्वतःहून औषधं बंद करतात. मात्र ही सवय धोकादायक ठरू शकते. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा रक्त पातळ ठेवण्यासाठी दिलेली औषधं दररोज वेळेवर घेतल्यासच त्यांचा योग्य परिणाम होतो.
पावसाळ्यात हवामान बदलल्यामुळे, शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे किंवा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे रक्तदाब कमी-जास्त होऊ शकतो. आठवड्यातून किमान दोन वेळा घरीच रक्तदाब मोजा आणि त्याची नोंद वहीत किंवा मोबाईलमध्ये ठेवा. रक्तदाब सतत जास्त किंवा कमी राहत असेल तर लगेच डॉक्टरांना कळवा.
पावसाळ्यात घाम कमी येत असल्याने अनेक जण कमी पाणी पितात. मात्र त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन चक्कर येणं, रक्तदाब कमी होणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढू शकतो. ज्या रुग्णांना हार्ट फेल्युअर किंवा किडनीचा आजार आहे, त्यांनी किती पाणी प्यायचं याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं.
पावसाळ्यात खाण्यातून होणारं इन्फेक्शन आणि फूड पॉइझनिंगचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रस्त्यावरील पदार्थ, कापून ठेवलेली फळं, उघडं सॅलड किंवा फिल्टर न केलेलं पाणी पिणं टाळावं. घरचं ताजं, गरम आणि पौष्टिक अन्न खाण्यावर भर द्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असावा.
पावसामुळे बाहेर चालायला जाता येत नसेल तरी दिवसभर एकाच जागी बसून राहू नका. घरातच फेरफटका मारा. डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर हळूहळू जिने चढा. योग, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम नियमित करा.
पावसाळ्यात व्हायरल संसर्ग, फ्लू, डेंग्यू, मलेरिया तसंच श्वसनाचे आजार वाढतात. कोणताही संसर्ग झाल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हार्ट फेल्युअर किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हात वारंवार स्वच्छ धुवा. घराजवळ पाणी साचू देऊ नका.
छातीत दुखणे, दडपण किंवा जडपणा जाणवणं
अचानक धाप लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं
पाय, घोटे किंवा पोटावर सूज येणं
हृदयाचे ठोके खूप वेगाने पडणं किंवा अनियमित होणं
चक्कर येणं, अचानक अशक्तपणा जाणवणं किंवा बेशुद्ध पडण्याची भावना होणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.