नवरा-बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या धाग्यांनी बांधलेलं असतं. पण हेच प्रेमाचं बंधन विश्वासघातामुळे तुटतं आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतं. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडातून समोर आली, ज्याने अनेकांचं काळीज हादरलं. मुस्कान रस्तोगीने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने आपल्या पती सौरभची क्रूरपणे हत्या केली. त्याचे १५ तुकडे करून ड्रममध्ये कोंबले आणि वरून सिमेंट ओतलं. बायकोने नवऱ्याचा जीव घेतल्याची ही एकमेव घटना नाही. महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या, जिथे बायकोने नवऱ्याला मारहाण केली किंवा जीव घेतला.
नात्यात वाद होणं स्वाभाविक आहे, पण ते वेळीच सोडवणं गरजेचं असतं. मात्र, नात्यात विश्वासघात आला की गुन्हेगारी जन्म घेते. नवऱ्याने बायकोला मारल्याच्या घटना आपल्यासाठी नव्या नाहीत. पण गेल्या काही दिवसांत बायकोने नवऱ्याचा मानसिक छळ केला, मारहाण केली, किंवा नव्या नवरीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला अशा घटना वाढताना दिसत आहेत. विशेषतः मागील ८ ते १० दिवसांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण बायकोची नवऱ्याचा जीव घेण्याची मानसिकता कशी तयार होते? महिला इतक्या क्रूर का होत आहेत? आयुष्यभराच्या जोडीदाराचे तुकडे करून गुन्हा लपवण्याची मानसिकता नेमकी कुठून येते? असे प्रश्न मनात घोळत आहेत. पण त्याआधी, गेल्या काही दिवसांत घडलेल्या या घटनांवर एक नजर टाकूया.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडलेल्या सौरभ हत्याकांडामुळे देश हादरलाय. मर्चंट नेव्हीमधील नोकरी सोडून सौरभ हा लंडनमध्ये एका मॉलमध्ये कामाला होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो घरी परतला, पण त्याच्या भाग्यात वेगळेच लिहिले होते. पत्नी मुस्कान हिने प्रियकरासोबत सौरभला मारण्याचा कट रचला होता. मुस्काननं सौरभला बेशुद्ध करण्यासाठी जेवणात अंमली पदार्थ मिसळले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्रांनी १५ तुकडे केले. मृतदेह सापडू नये म्हणून एका ड्रममध्ये तुकडे टाकले अन् वरून सिमेंट ओतले. इतक्यावरच ती थांबली नाही, नवऱ्याला मारल्यानंतर प्रियकारासोबत आठ दिवस फिरायला गेली. ती घरी परतल्यानंतर बिंग फुटले.
विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याकांडामुळे पुणे हादरले होते. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. पैशासाठी हत्या झाल्याचा अंदाज बांधला जात होता. पण पोलिसांच्या तपासात वेगळेच सत्य समोर आले. सतीश वाघ यांच्या हत्येमागे त्यांच्या पत्नीचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले अन् पुणे हादरले. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांचं अक्षय जावळकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध झाले. हे सतीश वाघ यांना समजले. त्यानंतर मोहिनी हिने सतीश वाघ यांच्या अपहऱण आणि हत्येची सुपारी दिली. मोहिनी आणि प्रियकर अक्षय सध्या तुरूंगात आहेत.
गेल्या आठवड्यात मुंबईतही बायकोने नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार घडला. गोरेगाव पूर्व येथे राहणाऱ्या २८ वर्षीय रंजूने प्रियकर शाहरुख आणि त्याच्या दोन मित्राच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली. चंद्रशेखर चौहान (३६) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
जयपूरमध्ये मेरठच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये झाली. बायकोचं बाहेर अफेअर होतं, नवऱ्याला ते समजलं. नवरा जाब विचारण्यासाठी गेला पण त्याचा काटा काढण्यात आला. राजस्थानच्या जयपूरमधील गोपाली देवी सैनी हिचे दीनदयाल याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गोपाली देवी या दीनदयाल याच्या दुकानामध्ये काम करत असे. तर तिचा नवरा धन्नालाल सैनी हा भाजी विकण्याचे काम करत होता. धन्नालालला दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले. रागाच्या भरात तो दीनदयालच्या दुकानात पोहोचला. दीनदयाल, गोपाली देवी आणि धन्नालाल यांच्या बाचाबाची झाली. पुढे भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा गोपाली देवी आणि दीनदयाल यांनी केलेल्या मारहाणीमध्ये धन्नालालचा मृत्यू झाला. मतदेह गोणीमध्ये भरला अन् विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञात ठिकाणी नेला. ठरलेल्या जागी पोहचल्यावर त्यांनी गोणीसकट मृतदेह जाळला.
मेरठमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारूड्या नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर बायकोने त्याला ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. त्याचा हात कापला, डोक्यात विट मारली. घाबरलेला नवरा धावत धावत पोलिसांत पोहचला अन् तक्रार केली. त्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये नवऱ्याने बायकोविरोधात पोलिसात धाव घेतली, त्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले. पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ५ हजार रुपये मागत असल्याचा आरोप त्याने केला. तसेच स्पर्श करताच पत्नी आत्महत्या करणार असल्याची धमकी देत असल्याचंही त्याने सांगितलं.
नवऱ्याचा जीव घेण्यासाठी नवरीने २ लाख रूपयांची सुपारी दिली होती. लग्नाच्या १५ दिवसानंतरच नवरीने नवऱ्याचा काटा काढला. तपासानंतर पोलिसांनी नवरी आणि बायफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील सहार येथे घडली.
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये एका तरुणाने बायको आणि सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. फेसबुकवर लाईव्ह करत या तरुणाने आत्महत्या केली. त्यावेळी त्याची निर्दयी पत्नी आणि सासू लाइव्ह व्हिडीओ बघत होत्या. पण त्यांनी या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं नाही.
पत्नीच्या सततच्या कटकटीला वैतागून हरियाणातील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ बनवला, त्यात त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं होतं. परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत आयुष्य संपवलं. बायको आणि कुटुंबातील इतर व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून स्वत: वर गोळी झाडली. ही घटना हरियाणातील बहादूरगड येथे घडलीय. नरेंद्र छिकारा, असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांच्या मते, यामागं पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा Poor Emotional Regulation म्हणजेच भावनांचं योग्य नियंत्रण न राखता येणं हे महत्त्वाचं कारण ठरू शकतं. अनेकदा नवरा-बायकोच्या नात्यातील तणाव इतका तीव्र होतो की तो थेट हिंसक वळण घेतो. Poor emotional regulation ही अनेकदा violent conflict resolution कडे नेते – जिथे संवादाऐवजी सूड, राग किंवा हिंसा निवडली जाते.
या गोष्टी टाळण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणं अत्यावश्यक आहे. लहान वयातच बरोबर-चूक यातील फरक समजावून देणं, आणि भावनिक साक्षरता विकसित करणं हे मुलभूत पातळीवरचं काम आहे. त्याचबरोबर, नात्यात ताण जाणवत असल्यास कुठे मदत मिळेल, कोणाशी बोलता येईल, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलंय.
डॉ. प्रशांत सांगतात की, सरकारकडून धोरणं बनवली जाणं ही नक्कीच गरज आहे, पण त्यासाठी जनतेनंही आवाज उठवणं तितकंच महत्त्वाचं आहे. समाजात अशा घटनांना आळा घालायचा असेल, तर केवळ शिक्षा पुरेशी ठरत नाही. सामाजिक जागरूकता, मानसिक आरोग्याची सुलभ उपलब्धता, आणि जबाबदार नागरिकत्व या सगळ्यांचा समन्वय आवश्यक आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंडदा म्हणाले, या घटनांना प्रामुख्यानं तीन कारणं जबाबदार आहेत. यामधील पहिलं कारण म्हणजे Substance abuse. या गोष्टीमुळे व्यक्तीच्या विवेकबुद्धीवर परिणाम होतो आणि तो अशी चुकीची पावलं उचलू शकतो. अशा परिस्थितीत व्यक्ती कोणत्याही गोष्टींची मर्यादा पार करून चुकीचा मार्ग अवलंबतो.
सरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकरणांमध्ये म्हणजे लव्ह ट्रँगलमध्ये चुकीचं काम करण्यासाठी भडकावणाऱ्या व्यक्तीचाही समावेश असतो. एखाद्या व्यक्तीला जीवे मारणं हे आपल्या प्रेमासाठी कसं योग्य आहे हे कोणीतरी पटवून देत असतं. प्रेमासाठी ही बाधा दूर करणं गरजेचंच आहे, हे मारणाऱ्या व्यक्तीच्या मनावर बिंबवलं जातं. एका अर्थाने त्याचं पूर्णपणे ब्रेन वॉश केलं जातं. परिणामी व्यक्ती चुकीचं पाऊल उचलते. यामधील तिसरं कारण म्हणजे Anti social elements. यामध्ये व्यक्ती समाजाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करते. या कारणामुळे अशा घटना घडू शकतात, असंही डॉ. सागर यांनी सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.