डोके दुखत असेल तर एक गोळी घेतली, पाठदुखी झाली तर दुसरी, तर दिवसभराच्या थकव्यानंतर शरीरदुखी कमी करण्यासाठी आणखी एक. अनेकांच्या आयुष्यात हे अगदी नेहमीचं झालंय. ही औषधं सहज मेडिकलमध्ये मिळतात त्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा अनेकांचा समज असतो. पण वारंवार घेतल्या जाणाऱ्या या पेनकिलर्स हळूहळू तुमच्या किडनीला धोका पोहोचवत असतील, याचा विचारही अनेकांच्या मनात येत नाही.
यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे किडनी खराब होण्याची प्रक्रिया अनेकदा शांतपणे सुरू असते. सुरुवातीला वेदना होत नाहीत आणि ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे समस्या लक्षात येईपर्यंत किडनीचं बरेच नुकसान झालेलं असू शकतं.
डोकेदुखी, सांधेदुखी किंवा अंगदुखीसाठी घेतली जाणारी काही वेदनाशामक औषधं किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करू शकतात. किडनीचं मुख्य काम म्हणजे शरीरातील घाण, टॉक्सिन पदार्थ आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून बाहेर टाकणं. हे काम सुरळीत करण्यासाठी किडनीला पुरेशा प्रमाणात रक्त मिळणं गरजेचं असतं.
पण अशा औषधांचा वारंवार किंवा दीर्घकाळ वापर केल्यास किडनीपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे किडनीच्या ऊतींवर ताण येतो आणि हळूहळू त्यांचं नुकसान होऊ लागतं. ही प्रक्रिया खूप हळू असल्यामुळे सुरुवातीला त्याची जाणीव होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे सतत घेणं धोकादायक ठरू शकतं. यावेळी कोणती लक्षणं दिसतात ती पाहूयात.
किडनीची क्षमता कमी झाली की हे अतिरिक्त द्रव शरीरात साचू लागतं. त्यामुळे पाय, घोटे किंवा पोटऱ्यांमध्ये सूज दिसू शकते. वारंवार किंवा सतत अशी सूज राहत असेल आणि त्याचबरोबर पेनकिलर औषधांचा वापर नियमित होत असेल तर हे किडनीच्या समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.
किडनीचा थेट संबंध लघवी तयार होण्याशी असतो. त्यामुळे लघवीचं प्रमाण, रंग किंवा दिसण्यात बदल होणं ही महत्त्वाची चिन्हं असू शकतात. काही लोकांना नेहमीपेक्षा कमी लघवी होऊ शकते तर काहींना लघवीचा रंग किंवा स्वरूप बदलल्याचं जाणवू शकतं. हे बदल हळूहळू होत असल्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होतं. पण अशी लक्षणं किडनीची कार्यक्षमता कमी होत असल्याचे संकेत देत असू शकतात.
प्रत्येकालाच कधी ना कधी थकवा जाणवतो. पण किडनीशी संबंधित थकवा वेगळा असतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही अशक्तपणा आणि ऊर्जा कमी असल्याची भावना कायम राहू शकते. किडनीचं काम कमी झाल्यास शरीरातील घाण आणि अपायकारक पदार्थ पूर्णपणे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे शरीरात त्यांचा साठा वाढू लागतो आणि त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि काम करण्याची इच्छा कमी होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.