आजकाल वाढलेलं वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. लग्न, एखादा खास कार्यक्रम किंवा फिट दिसण्यासाठी अनेक जण कमी वेळात वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एका महिन्यात ५ ते ७ किलो वजन कमी करता येतं का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. याचं उत्तर हो असं आहे. मात्र ते प्रत्येकासाठी सारखं लागू होत नाही.
जयपूरचे महात्मा गांधी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ प्रांजल कुमत यांच्या मते, ज्यांचं सुरुवातीचं वजन जास्त आहे, ते योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली पाळल्यास एका महिन्यात ५ ते ७ किलो वजन कमी करू शकतात. पण उपाशी राहणं, क्रॅश डाएट करणं किंवा अती डाएटिंग करणं योग्य नाही. त्यामुळे वजन कमी झालं तरी शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
त्यांच्या मते, वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नव्हे. योग्य वेळी, योग्य प्रमाणात पौष्टिक आहार घेणं आणि शरीर सतत सक्रिय ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्याचा डाएट प्लॅन आपल्यालाही तसाच उपयोगी पडेल, असं नाही. ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांचं सुरुवातीच्या महिन्यात ५ ते ७ किलो वजन कमी होऊ शकतं. मात्र ज्यांचं वजन आधीपासूनच सामान्य आहे, त्यांनी इतक्या वेगाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये.
सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. साधं कोमट पाणी पिणं जमत नसेल तर त्यात लिंबाचा रस घालू शकता. रात्रभर पाणी न प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होण्यास मदत होते.
कोमट पाणी प्यायल्यानंतर साधारण ४० ते ४५ मिनिटांनी व्यायाम करा. वेगाने चालणं, जॉगिंग, सायकलिंग, योगा किंवा दोरीच्या उड्या यापैकी कोणताही व्यायाम निवडू शकता. शक्य असल्यास आठवड्यातून ३ ते ४ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंगही करा. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते आणि स्नायू मजबूत राहतात.
वजन कमी करताना नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. नाश्त्यात ओट्स, पोहे, मूग डाळीचा चिल्ला, बेसन चिल्ले, उकडलेली अंडी, मोड आलेली कडधान्यं आणि फळांचा समावेश करा. दिवसाची सुरुवात पौष्टिक आहाराने केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
नाश्त्यानंतर काही वेळाने एखादं हंगामी फळ, नारळपाणी, ताक, मूठभर बदाम किंवा अक्रोड खा. यामुळे वारंवार भूक लागत नाही. तसंच पोट जास्त वेळ भरलेलं राहिल्याने अनावश्यक खाणं टाळता येतं.
कामाच्या धावपळीत अनेक जण दुपारचं जेवण टाळतात. पण त्यामुळे नंतर भूक वाढून जास्त खाण्याची शक्यता असते. दुपारच्या जेवणात २ मल्टिग्रेन पोळ्या, एक वाटी डाळ, हिरवी भाजी, सॅलड आणि दही यांचा समावेश असावा. संतुलित जेवण वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.
संध्याकाळी सर्वाधिक भूक लागते. अशावेळी ग्रीन टी, भाजलेले हरभरे, मखाणे, मोड आलेली कडधान्यं किंवा सूप घ्या. बिस्किटं, नमकीन, वेफर्स आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा.
वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण टाळू नका. रात्री सूप, पनीर, डाळ, भाजी आणि सॅलड खा. झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी पुरेसं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून साधारण २.५ ते ३.५ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखादं औषध घेत असाल किंवा ज्या ठिकाणी राहता तिथे खूप उष्णता असेल तर पाण्याचं प्रमाण गरजेनुसार वाढवू शकता.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.