Health Care: व्हिटॅमिन B12 हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक असूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मेंदूचे कार्य, मज्जासंस्थेचे आरोग्य आणि लाल रक्तपेशींची निर्मिती यासाठी B12 आवश्यक भूमिका बजावतो. मात्र, याची कमतरता झाल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता सुरुवातीला सहज लक्षात येत नाही. सतत थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा मनःस्थितीत बदल ही याची सामान्य लक्षणे आहेत. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास अॅनिमिया आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, शरीर स्वतःहून व्हिटॅमिन B12 तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून मिळवणे आवश्यक आहे. शाकाहारी लोकांमध्ये ही कमतरता अधिक प्रमाणात आढळते, कारण वनस्पतीजन्य अन्नामध्ये B12 कमी प्रमाणात असते. दूध, दही, पनीर, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये काही प्रमाणात B12 मिळते. तसेच फोर्टिफाइड सीरिअल्स, ओट्स, सोया किंवा बदाम दूध, टोफू आणि न्यूट्रिशनल यीस्ट हेही चांगले पर्याय ठरू शकतात.
मांसाहारी अन्नामध्ये मात्र B12 मुबलक प्रमाणात आढळते. चिकन, मटण, अंडी आणि विशेषतः लिव्हर हे याचे समृद्ध स्रोत आहेत. तरीदेखील, केवळ B12 असलेले अन्न खाणे पुरेसे नसून त्याचे शरीरात योग्य शोषण होणेही गरजेचे आहे. काही औषधे जसे की मधुमेहासाठी वापरले जाणारे metformin किंवा अॅसिडिटीसाठीचे proton pump inhibitors यामुळे B12 चे शोषण कमी होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन B12 ची गरज असते. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक या कमतरतेने ग्रस्त असल्याचेही अभ्यासातून दिसून आले आहे. याशिवाय, जेवणाच्या आधी किंवा लगेच नंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय B12 च्या शोषणावर परिणाम करू शकते. त्यामुळे अशा सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. संतुलित आहार असूनही कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.