Lock Upp 2: रितेश देशमुख आणि फराह खान यांचा 'लॉक अप सीझन २' या रिअॅलिटी शोमध्ये दररोज नवे वाद आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा या भावूक झाल्या. शोमध्ये जेवण चांगलं नसल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी रडतच शो सोडून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी जेलमध्ये जेवण बनवण्यासही स्पष्ट नकार दिला.
शोच्या सातव्या दिवशी सुनीता आहुजा यांनी स्पर्धकांना मिळणाऱ्या जेवण चांगलं नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे होते की, स्पर्धकांकडून कोणताही विरोध होत नसल्यामुळे निर्मात्यांकडून त्यांना गृहीत धरले जात आहे. त्यांनी इतर स्पर्धकांना एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले. "आपण सर्वजण उपाशी आहोत. माझी मुलंसुद्धा इथे उपाशी आहेत," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी सुनीता यांनी सूपच्या चवीवरही टीका केली. त्यांनी संतापाच्या भरात सूपची चव "गोमूत्रासारखी" असल्याचे वक्तव्य केले. तसेच, "मी शांत आहे म्हणून माझा गैरफायदा घेऊ नका. फक्त फुटेजसाठी काहीही करू नका. मला आजच इथून निघून जायचे आहे," असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.
सुनीता यांनी पती गोविंदाचा उल्लेखही केला. "ची ची (गोविंदा) मला या शोमध्ये सहभागी होऊ नकोस, असे वारंवार सांगत होते. पण मी त्याचं ऐकले नाही आणि आता मला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मला इथे अजिबात राहायचे नाही," असे म्हणत त्या ढसाढसा रडू लागल्या.
त्यानंतर त्यांनी रितेश देशमुख यांच्यासमोरही आपली व्यथा मांडली. "आम्ही कचरा आहोत का?" असा सवाल करत त्यांनी आपल्या मुलांची आठवण येत असल्याचे सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून रितेश देशमुख यांनी त्यांची समजूत काढली. त्यांनी सुनीता यांना मिठी मारत शांत केले आणि टास्क संपल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन दिले.