Sulochana Chavan News: लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांचे जाण्याने कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुचलोचना चव्हाण यांना राजकीय वर्तुळातून नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (CM)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार
ज्येष्ठ पार्श्वगायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. बुलंद आवाज व ठसकेबाज शैलीने त्यांनी लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अशी शब्दात शरद पवार यांनी सुलोचना चव्हण यांना श्रद्धांजली दिली आहे. (Sharad Pawar)
सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्याची शोक भावना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्द असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटातुन त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्तम करू शकलेले नाही. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातुन रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधिही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार
"ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांचं निधन हे महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक विश्वासाठी धक्का आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीतातील देदिप्यमान युगाचा अंत झाला आहे. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...', 'पाडाला पिकलाय आंबा..', 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' सारख्या अजरामर लावण्यांनी त्यांनी रसिकांच्या पिढ्या मंत्रमुग्ध केल्या. महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन, महाराष्ट्राची लोककला, लोकजीवन, लोकसंस्कृती मूळ रंगात, मूळ ढंगात, अस्सल बाजासह रसिकांसमोर सादर केलं. महाराष्ट्राचं कलाविश्व समृद्ध करणाऱ्या सुलोचनाताई नवोदित कलावंतासाठी सदैव आदर्श, मार्गदर्शक राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.