KBC 18 : कौन बनेगा करोडपतीच्या १८व्या सीझनमध्ये अनेक स्पर्धक आपल्या ज्ञानासोबतच आयुष्यातील संघर्षांच्या कहाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याच कार्यक्रमात बुधवारी CRPFचे डेप्युटी कमांडंट मनोज कुमार यादव सहभागी झाले होते. यावेळी मनोज यांनी आपल्या सेवाकाळातील अनेक धक्कादायक अनुभव अमिताभ बच्चन यांच्यासोबत शेअर केले. मनोज यांनी खेळातील १४ प्रश्नांची अचूक उत्तरे देत ५० लाख रुपये जिंकले. यासाठी त्यांनी सर्व लाइफलाइन्सचा वापर केला. मात्र, त्यानंतर त्यांच्यासमोर १ कोटी रुपयांचा १५वा प्रश्न आला. या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे माहीत नसल्याने त्यांनी जोखीम न घेता गेम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना १ कोटीसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
काय होता १ कोटींचा प्रश्न?
मनोज यांना विचारण्यात आले की, ‘गोल्डन गेट ब्रिज’ ज्या सामुद्रधुनीच्या नावावरून ओळखला जातो, त्या सामुद्रधुनीला ‘गोल्डन गेट’ हे नाव देण्याचे श्रेय कोणत्या शोधकर्त्याला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला जाते?
या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले होते— जेम्स ब्लेन, जॉन फ्रेमोंट, विनफील्ड स्कॉट आणि लेलँड स्टॅनफोर्ड. उत्तराबाबत खात्री नसल्याने मनोज यांनी ५० लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठेवत खेळ सोडला. गेममधून बाहेर पडल्यानंतर अंदाज विचारला असता त्यांनी विनफील्ड स्कॉट हे उत्तर दिले. मात्र, हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर जॉन फ्रेमोंट होते.
कार्यक्रमात मनोज यांनी आपल्या CRPF सेवाकाळातील धक्कादायक अनुभवही सांगितला. श्रीनगर, झारखंड, अहमदाबाद यांसह विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. कोब्रा युनिटसोबत काम करताना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांनी 'कोब्रा'मधील ट्रेनिंगबद्दल विचारले, तेव्हा मनोजने स्पष्ट केले की, मनोज यांनी सैनिकांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाते. कधीकधी, त्यांना जंगलात एकटे सोडले जाते, जिथे त्यांना स्वतःचे रक्षण करावे लागते आणि अचानक येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते, जेणेकरून ते नेहमी लढाईसाठी सज्ज राहतील. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी विचारले की, जगण्यासाठी त्यांना साप खावे लागत होते का, तेव्हा मनोज यांनी दुजोरा देत सांगितले, हा प्रशिक्षणाचाच एक भाग आहे, कारण सैनिकांना अन्न आणि पाण्याशिवाय, अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत राहण्यासाठी तयार राहावे लागते.
झारखंडमधील एका चकमकीत त्यांच्या उजव्या डोळ्याला स्प्लिंटर लागल्याचेही मनोज यांनी सांगितले. या दुखापतीमुळे त्यांच्या रेटिनावर परिणाम झाला आणि दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, देशसेवा करण्याची जिद्द असल्याने अशा प्रसंगांनी आपण खचत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५० लाख रुपये जिंकून मनोज कुमार यादव यांनी ‘कौन बनेगा करोडपती १८’मधील आपला प्रवास संपवला. १ कोटींच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता आले नसले, तरी त्यांची जिद्द आणि देशसेवेची कहाणी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून गेली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.