सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. अशात आता सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता सोनू सूद पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाला की, "काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला जागा नसावी आणि हे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर आरोग्य मिळो ही प्रार्थना.
विवेक ओबेरॉय पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त करत म्हणाला, "काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने आपली ह्रदय पिळवटून टाकली आहेत. हे दु:खाचे सावट आपल्यावर आले आहे. ज्यांनी यात आपले कुटुंब गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना आहेत. आता जगाने पूर्वीपेक्षाही अधिक द्वेषाविरुद्ध एकजुटीने एकत्र आले पाहिजे, शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
संजय दत्त पोस्ट शेअर करत म्हणाला, "त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. या दहशतवाद्यांना हे माहित असले पाहिजे की, आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला बदला घ्यावा लागेल. मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमिता शाह जी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांना विनंती करतो की त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अक्षय कुमार म्हणाला की, "पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती ऐकून भयभीत झालो. अशा प्रकारे निरपराध लोकांना मारणे अत्यंत वाईट आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना."
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त करत म्हणाली की, "अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत… दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते? हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का ? हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत? अश्या घटना घडतात तेंव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्स वर विश्वास कसा ठेवायचा? हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही ? “त्या हरामखोरांकडून” सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण ? इतक्या हल्ल्यांनंतरही “त्यांच्या” घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण ? निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आपण ? असे अनेक प्रश्न...तुम्हालाही हे भेडसावतात ? काळी रात्र ,सुन्न मन!"
सई ताम्हणकर इन्स्टाग्राम स्टोरी टाकत म्हणाली की, "काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला. मी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते. ज्यांनी यात आपले कुटुंब गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना आहेत. हिंसा कधीच जिंकू शकत नाही. "
मराठी अभिनेता सौरभ गोखले तीव्र शब्दात म्हणाला की, "पूर्ण भिकेला लागला तरी तो देश सुधारणार नाही…घुसून मारा! सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण तुमच्या मुलांना जरूर द्या. परंतु, तुमच्या धर्मावर बोट ठेवून तुमच्यावर अत्याचार होत असेल तर, ते बोट छाटायची हिंमत, ताकद आणि धर्माभिमानही त्याच्यात जागृत करा! ही काळाची गरज आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.