आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध.
"माझ्या लोकांचं रक्त सांडलं, मग पाकिस्तानशी का खेळावं?" – नाना पाटेकर.
पुण्यात नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केली ठाम भूमिका.
Ind Vs Pak आशिया कप २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला देशभरातून विरोध होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी संबंध ठेवायचा नाही असा पवित्रा भारताने घेतला. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटचे सामने होऊ नये अशीही मागणी झाली. आता आशिया कपमध्ये हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होऊ नये असे अनेकांना वाटते. यासंदर्भात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते म्हणाले, 'माझं वैयक्तिक मत असंं आहे, की भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये. मला असं वाटतं माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... त्या त्यांच्याशी का खेळावं असं मला वाटतं'.
'सरकारी धोरण काय आहे किंवा त्यांचे नियम काय आहेत ते मला माहीत नाही, पण जर तुम्ही वैयक्तिक मत विचाराल, तर आपण (भारतीय संघ) खेळू नये', असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. नाम फाउंडेशनच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पुण्यात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान नाना यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे दशकपूर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.