Crime News in Maharashtra : चांगुलपणा या जगात शिल्लकच नाही असं आता लोक म्हणू लागलेत. याशिवाय मुलांमधील सहनशक्ती संपलेली आहे, हे दर्शवणाऱ्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. कुणाला सल्ला दिला तर, ऐकून न घेता मी करतो तेच योग्य अशी वृत्ती झालीये. यातूनच द्वेषभावना, भांडण-तंटे होतातच, पण हाणामारी आणि हत्या करण्यापर्यंत प्रकरणं पोहोचली आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात घडली आहे. व्यसन करू नका, वाईट संगतीला लागू नका असा सल्ला दिल्यानं ५० वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. या सल्ल्यांनी चिडलेल्या १५ वर्षीय मुलाने त्यांची निर्घृणपणे हत्या केली.
रोहिदास खकाळ (वय ५०) हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यामुळे ते घरीच असायचे. त्यांच्या घराच्या ओटीवर काही मुलं येऊन बसायची. बराच वेळ त्यांचा गोंधळ चालायचा. ती मुले ओटीवर बसून व्यसने करायची. त्यामुळे रोहिदास यांना त्यांचा प्रचंड राग यायचा. ते त्यांच्यावर रागवायचे. मुलांची त्यांनी अनेकदा समजूतही घातली आहे. ओट्यावर बसून सिगारेट ओढू नका, व्यसने करू नका, तसेच वाईट संगतीत राहू नका, असा काळजीपूर्वक सल्ला ते अनेकदा मुलांना देत होते. याचाच राग मुलांना यायचा. या १५ वर्षाच्या मुलाच्या मनातही राग होताच. खकाळ हे अनेकदा ओटीवर बसून सिगारेट ओढायचे. मित्रांसोबत गप्पा मारायचे. त्यामुळे मुलांना तिथे जाता येत नव्हते. त्यामुळे मुले आणि खकाळ यांच्यात कायम खटके उडायचे.
खकाळ हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी त्यांना अचानक घराचा दरवाजा जोरजोरात ठोठावल्याचा आवाज आला. त्यांनी दार उघडलं. त्यांच्यासमोर तो ओट्यावर बसून व्यसन करणारा मुलगा उभा होता. मुलगा प्रचंड रागात होता. त्यानं खकाळ यांना धमकावलं. नंतर अचानक धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. जखमी झालेले खकाळ जागीच जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खकाळ यांची हत्या करणारा अल्पवयीन आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समजते. यापूर्वी देखील त्याने अशाच प्रकारे काही जणांवर हल्ले केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हत्येचे प्रयत्नही त्याने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.