क्राइम नेव्हर पेज!... गुन्हा कधी लपत नाही. एक ना एक दिवस तो पकडला जातोच! त्याचाच प्रत्यय नुकताच आलाय. ३० व्या वर्षी गंभीर गुन्हा केला. त्यात अटकही झाली. जामिनावर सुटला आणि त्यानंतर गायबच झाला. पण मुंबई(Mumbai) पोलिसांनी याच गायब आरोपीला तब्बल ४० वर्षांनी बेड्या ठोकल्यात.
आता हाच आरोपी ७० वर्षांचा झालाय. पापा उर्फ दाऊद बंदू खान असं या आरोपीचं नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातल्या आग्र्यातून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली, ती त्याचीच पत्नी निघाली. पण आता त्याची पत्नी आणि तक्रारदार असलेली तिची आई या दोघींही हयात नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊद हा मुंबईत राहायचा. त्याच्या परिसरातच राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलीच्या तो प्रेमात पडला. त्यावेळी तो ३० वर्षांचा होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमसंबंधांना तिच्या आईचा कडाडून विरोध होता. तिनं डीबी मार्ग पोलीस ठाण्यात दाऊदविरोधात तक्रार दाखल केली. अपहरण आणि बलात्काराच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती.
काही दिवसांनी आरोपी दाऊदला कोर्टातून जामीन मिळाला. तो तुरुंगातून बाहेर आला. तिथून आल्यानंतर त्यानं मुलीशी लग्न केलं. लग्न केलं त्यावेळी मुलगी सज्ञात झाली होती. तिला बाळ झालं. त्यानंतर दोघेही कुणालाही न सांगता उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहायला गेले. तसं बघायला गेलं तर, दोघांनी आग्रा येथे जाण्यापूर्वी किंवा दोघांचं लग्न झालंय हे पोलीस किंवा कोर्टाला सांगायला हवं होतं. पण तसं त्यांनी केलं नाही.
त्याचदरम्यान या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया देखील पुढे सरकली नाही. त्यामुळं आता आपण पीडितेशीच लग्न केलंय आणि हे प्रकरण मिटलंय, असा आरोपी दाऊदचा समज झाला. काही वर्षे आरोपी कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळं कोर्टानं नोटीस बजावली. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर कोर्टानं त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आणि २०२० मध्ये त्याला फरार घोषित केलं.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आणि त्यातच या दाऊदचंही नाव समोर आलं. डीबी मार्ग पोलिसांनुसार, दाऊदविषयी काहीच माहिती मिळत नव्हती. वीस वर्षांपूर्वीच तो शिफ्ट झाल्याचं त्यानं कुणालाही कळवलं नव्हतं. त्याला शोधण्याचा एकच मार्ग होता. पीडितेच्या आईलाच त्यांचं ठिकाण माहीत होतं. पण तो मार्गही बंद झाला. कारण पीडितेच्या आईचं निधन झालं होतं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विनोद राणे यांनी तपास सुरू केला. त्यांनी त्या परिसरातून दाऊदबद्दलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याचा पत्ता मिळाला होता. पण कुणालाही त्याचं सध्याचं ठिकाण माहीत नव्हतं. काही जणांकडे विचारणा केली. त्याचवेळी एका शेफनं दाऊदबद्दल माहिती दिली. कारण १० वर्षांपूर्वीच दाऊदनंच त्याला एका लग्नासाठी आग्रा येथे बोलावलं होतं. पोलिसांनी तातडीनं त्याला आग्रा येथे सोबत नेलं आणि तिथून दाऊदला अटक केली.
एका त्या चुकीमुळं ७० व्या वर्षी तुरुंगात जावं लागलं!
पोलिसांनी दाऊदची चौकशी सुरू केली. त्यावेळी आपण मुलीशी लग्न केल्यानंतर हे प्रकरण तिथेच मिटलं, असा समज झाला होता, असं त्यानं सांगितलं. दिल्ली येथे २०११ मध्येच पीडितेचं म्हणजेच त्याच्या पत्नीचं निधन झाल्याचं सांगितलं आणि तिच्या मृत्यूचा दाखलाही त्यानं पोलिसांना दाखवला. दाऊदला कोर्टात हजर केलं. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दाऊदनं ४० वर्षांपूर्वी खूप मोठी चूक केली होती. त्यानं पीडितेशी लग्न केल्याचं कोर्टाला सांगितलं नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.