LPG supply India, PNG gas update : भारतामधील एलपीजी आणि पीएनजी पुरवठा स्थिर असल्याची माहिती केंद्र सरकारकडून आज देण्यात आली. ग्राहकांना गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. पुरवठा कायम ठेवण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना केल्या जात आहेत, असेही सांगण्यात आले.देशातील एलपीजी, पीएनजीच्या स्थितीवर केंद्र सरकारकडून आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
देशभरात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. गॅस संपल्याचे कोणतेही वृत्त नाही, असे सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले. घरगुती ग्राहकांना त्यांचे स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळत राहतील, असे सांगण्यात आले.
व्यावसायिक गॅस पुरवठा ७० % पर्यंत पूर्ववत -
पश्चिम आशियातील संकटामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी, केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे भारतातील एलपीजी पुरवठा स्थिर आहे. उत्पादन वाढवणे आणि डिलिव्हरी तपासणी (DAC 92%) कडक केल्यामुळे देशात घरगुती गॅसची कोणतीही टंचाई नाही. व्यावसायिक गॅस पुरवठा ७० % पर्यंत पूर्ववत झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग व ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी दिली.
सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्याला पूर्ण प्राधान्य देण्यात आले आहे. त्याशिवाय नव्या जोडण्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच ३९ हजारांहून अधिक ग्राहकांनी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन स्वेच्छेने परत केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे. अनियमिततेविरोधात अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. पुरवठा पुरेसा असल्याने नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन यावेळी सुजाता शर्मा यांनी केले.
दोन भारतीय जहाजांवर गोळीबार, भारताची पहिली प्रतिक्रिया -
३१ भारतीय खलाशांसह एक जहाज २२ एप्रिल रोजी मुंबईत दाखल होणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत दोन भारतीय जहाजांवर गोळीबाराच्या घटना घडल्या, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सरकार सतत खलाशांशी संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. आतापर्यंत २,५६३ हून अधिक खलाशांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. बंदरातील कामकाज सुरळीत सुरू असून कोणतीही गर्दी किंवा अडथळा नाही. सुरक्षा आणि मदत उपाय सुरू असल्याने नागरिकांनी शांत राहावे, असे आवाहन जहाजवाहतूक मंत्रालयाचे संचालक मंदीप सिंग रंधावा यांनी केले आहे.
आखाती देशांसोबत भारताचा संवाद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, आखाती देशांशी आमचा संपर्क आणि संवाद अविरत सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी १९ एप्रिल रोजी सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि त्यांचे समकक्ष सौदी अरेबियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी बैठका घेतल्या. विचारांचे आदानप्रदान करणे, द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणे, तसेच प्रादेशिक परिस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर चर्चा करणे या दृष्टीने या बैठका अत्यंत उपयुक्त ठरल्या. परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे रणधीर जैयस्वाल यांनी सांगितले.
२२ राज्यांना कोणते फायदे मिळत आहेत?
PNG नेटवर्कचा वेगाने विस्तार करणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्या राज्यांना १०% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी पुरवला जात असल्याचे सुजाता शर्मा यांनी सांगितले. या सरकारी धोरणाचा सध्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना फायदा होत आहे, ज्यांना त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हा अतिरिक्त एलपीजी पुरवठा मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.