जो काही निर्णय शासनाला घ्यायचा आहे, त्यात ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळेल असा निर्णय शासनाने घ्यावा, असे अनिल देशमुख म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून उमरगा येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संतप्त मराठा मराठा आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कार पेटवून दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उमरगा येथील एका तरुणाने तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत नाही, तोपर्यंत आम्ही मृत तरुणावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
राज्यभरात आज दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला जात असून अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मुंबईसह ठाण्यात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्याने दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय.
ठाण्यातील वर्तकनगर येथील उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने तब्बल ९ थर लावून सलामी दिली आहे. दरम्यान, दहीहंडीच्या उत्सवादरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
याशिवाय जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज झालीय आहे. नायर, केईएम, सायन रुग्णालयात जखमी गोविंदासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्यात. यावेळी त्यांना लागणारी औषधे रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे.
निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या घोषणेनंतर आता मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच, पण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, वंशावळीची अट ठेवू नये, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे. शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमाराचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे.
मराठा आंदोलकांनी मनमाड चौफुलीवर मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे.
मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी मधील आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज पुण्यातील हडपसर भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले.
यावेळी आंदोलकांनी जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत लवकरात लवकर राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची देखील मागणी केली
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या प्रमुख मागणीसह जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड जिल्ह्यात चक्काजामची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यात धुळे -सोलापूर महामार्ग, बीड -अहमदनगर, बीड -परळी, माजलगाव -परभणी, कल्याण- विशाखापट्टनम, खामगाव- पंढरपूर, अहमदपूर - पाटोदा या महत्त्वाच्या महामार्गासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावच्या रस्त्यावर देखील चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. दरम्यान जिल्ह्यात शेकडो ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद असणार असल्याची माहिती बीड आगार नियंत्रक अजय मोरे यांनी दिली आहे.
जालन्यात पोलिसांनी मराठा आंदालकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. गावागावात कडकडीत बंद पाळून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. सांगलीमध्ये 10 वाजता बाईक रॅली निघणार आहे.
या आंदोलनाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शिवप्रतिष्ठांनचे संभाजी भिडे यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन देखील केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवला आहे.
राज्यभरात आज दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असून अनेक ठिकाणी उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. गोविंदा पथकाचा थरार पाहण्यासाठी राज्यभरातून अनेकजण मुंबईसह पुण्यात दाखल झाले आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस आहे.
जालन्याच्या अंतरावली सराटी गावात येथे आज मराठा आंदोलकांची बैठक पार पडणार असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
‘ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जातील’, असं शिंदेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. यासह देश-विदेश तसेच राज्यभरातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.