काँग्रेसने लोकसभेच्या जागावाटपासाठी गठीत केलेल्या राष्ट्रीय आघाडी समितीची आज पहिली बैठक पार पडली. या समितीचे संयोजक मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राष्ट्रीय आघाडी समितीच्या बैठकीला समिती सदस्य राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांची उपस्थिती या बैठकीला होती. ही समिती आता विविध राज्यातील नेत्यांसोबत बैठका घेणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने क्यूरीटिव्ह दाखल करून घेतलं ही आनंदाची बातमी आहे. २४ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणारे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं, यासाठी हे पीटिशन आहे. वेगळं आरक्षण द्यायला माझा देखील पाठिंबा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
जरांगे मराठ्यांना डाग लागेल असं बोलतात. थोड्या वेळाने मराठ्यांच्या वाट्याला गेला तर काय होतं बीड वरून लक्षात ठेवा असं म्हणतात. म्हणजे बीडमध्ये जे घडलं ते त्यांनीच केलं. त्यांना वाटतं सगळा मराठा समाज त्यांच्या बाजूनेच आहे. पंढरपूरच्या यात्रेला तरी इतके लोक जमतात का? जात गणना करा, म्हणजे कळेल नेमके लोक किती, असं भुजबळ म्हणाले.
'शांततेत असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला गेला. आमच्यावर खोटा डाग लावला गेला आहे. निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केले. आपल्या पोरांनी काही केलं नाही, तरी गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांवर सरकारने गुन्हे दाखल केले, अशी टीका मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणावरील क्युरेटीव्ह पीटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. या पीटिशनचा निकाल हा २४ जानेवारीला लागणार लागणार आहे. याबाबतचा दावा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
शनी शिंगणापूर येथील शैनेशवर देवस्थानचे 400 कर्मचाऱ्यांनी 25 डिसेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून संपकाळी जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी या मागणीसाठी कर्मचारी 25 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या घरावर महामुक्काम करणार आहेत. असे पत्रच कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिला आहे.
शनी शिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांना मागील फरकासह सातवे वेतन लागू करण्यात यावे तसेच अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा पदनिश्चित करावी. यासह अन्य मागण्यासाठी तब्ब्ल 400 कर्मचारी संपावर जाणार आहेत. दरम्यान संपकाळी जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी आणि त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या घरावर मुक्काम करणार असल्याचा पवित्रा शिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विकेंड सुट्टी तसेच नाताळ सुट्टी मुळे पर्यटकांची गर्दी झाली आहे. अनेक मुंबईकर पर्यटक घराबाहेर निघाले त्यामुळे उर्से टोल नाक्यावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाक्यावर लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी टोल कर्मचारी यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे.
डमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. सध्या जरांगे पाटलांची बीड शहरात भव्य अशी रॅली सुरू आहे. तर याच सभेसाठी बीडच्या आंबेसावळी गावातून अकरा ट्रॅक्टरची रॅली निघाली आहे. हे ट्रॅक्टर काही वेळात सभास्थळी दाखल होणार आहेत. दरम्यान सभेला ट्रॅक्टर येणार नाहीत, असं सांगितलं जात होतं. मात्र गाव खेड्यातून आता ट्रॅक्टर येत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर उलटल्या.
या विचित्र अपघातात पहाटेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या तब्बल 6 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. त्यामधील दोन गाड्यांमधील काही भाविकांना जोराचा मार लागला असल्यामुळे पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
विकेंड आणि नाताळ सुट्टीमुळे पर्यटक कोकणाकडे
मुंबई, पुणे येथील पर्यटक कोकण आणि गोव्याच्या मार्गावर
माणगाव येथे सात ते आठ किलोमीटर लांब रांगा
वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची होते दमछाक
कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
कोरोनाबाधित महिलेची प्रकृती व्यवस्थित
गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे रण आतापासूनच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष प्रवेशांचे सोहळे होत आहेत. हिंगोलीत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षांतून दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
नाशिक
८ दिवसांत शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई न दिल्यास कंपन्यांविरोधात गुन्हे
पालकमंत्री दादा भुसे यांचा आढावा बैठकीत इशारा
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के मदत करण्याचे शासनाचे आदेश
जिल्ह्यातील ५५ महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी १०५ कोटी रुपये मंजूर
मात्र त्यापैकी फक्त ५७ कोटी ४६ लाख रुपयांचे विमा कंपन्यांकडून वाटप
राज्य सरकारने विमा कंपनीला ४०६ कोटी रुपये वर्ग करून देखील विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत नाही
येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्यात आली नाही, तर संबंधित पीकविमा कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा भुसे यांचा इशारा
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुंषगाने संभाव्य लागणारा खर्च, विविध विभाग, विद्यापीठाची सर्वसाधारण रचना याबाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची ही समिती आहे. विद्यापीठाची रचना आणि इतर लागणाऱ्या सर्व संभाव्य गोष्टींचा अहवाल या समितीला २ महिन्यांत सरकारला सादर करावा लागणार आहे.
महाड येथील दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल
महिला पोलिसांना दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप, सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
जमावबंदीचे आदेश झुगारून दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलमांचा दाखल गुन्ह्यात समावेश
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल प्रक्रियेत पोलिसांमार्फत कमालीची गुप्तता
काल शुक्रवारी संध्याकाळी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात झाला होता राडा
मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या म्हणजेच रविवारी संपणार आहे. याआधी आज बीडमध्ये मनोज जरांगे यांची 'निर्णायक मराठा' सभा होत आहे. या सभेसाठी मराठा बांधवांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, सभेआधी जरांगे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, त्यांनी दिलेला शब्द पाळावा. आम्ही आता वेळ वाढवून देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. सरकारसोबत आणखी किती दिवस चर्चा करावी, गिरीश महाजन यांचा मला फोन आला होता, असंही जरांगे म्हणाले.
पंढरपूर येथे सर्व सोयीनियुक्त असे नामसंकीर्तन संकुल उभारण्याच्या कामासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नामसंकीर्तन संकुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. प्रशांत जाधव यांनी दिली.
५ वर्षांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बाब म्हणून अद्ययावत असे नामसंकीर्तन संकुल उभारणीच्या कामाला मंजुरी दिली होती. मागील पाच वर्षांत इमारत बांधकामासाठी सुमारे २७ कोटी रूपये खर्च झाले आहेत.
उर्वरित कामासाठी आणखी २५ कोटींच्या निधीची गरज होती. त्यामुळे मागील वर्षभरापासून हे काम रखडले होते. अलिकडेच नगरपालिकेने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानोरा तालुक्यातील इंझोरी गावाजवळ असलेल्या अडाण नदीपात्रात एक महिला बुडाली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी भैसे असं नदीत बुडालेल्या महिलेचं नाव आहे.
'सास कंट्रोल रूम च्या स्वयंसेवकांनी वैष्णवीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला नदीपात्राजवळ लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी ती पाय घसरुन पाण्यात पडली, असा दावा तिच्या पतीने केला आहे.
महिला पाण्यात बुडाल्याचं कळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. मात्र, रात्री अंधार झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली. महिलेला शोधण्यासाठी 'सास कंट्रोल रूम च्या स्वयंसेवकांनी आज पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव रवाना झाले आहेत. जरांगे यांच्या स्वागतासाठी २०१ जेसीबी तयार ठेवण्यात आले आहे. याशिवाय हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे.
जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. त्यामुळे जरांगे आजच्या सभेत काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळीच पुणे दौरा सुरू केला आहे.
यावेळी महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या चेंबरमुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चेंबर काढण्याच्या आयुक्तांना त्यांनी सूचना दिल्या आहेत. देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नवा व्हेरिएंटचे राज्यात रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासह देश विदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स वाचण्यासाठी साम टीव्हीचा ब्लॉग फॉलो करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.