पुणे - देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याचं दिसतंय. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांत गेल्या 13 दिवसांत समाधानकारक पाऊस पडल्याचे चित्र असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. उत्तरेसह मध्य भारतात आतापर्यंतची सरासरी पावसाने ओलांडली.
राज्यात एक ते १२ ऑक्टोबरमध्ये सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला. कोल्हापूरमध्ये सरासरीच्या ८६ टक्के आणि सांगली येथे ६६ टक्के जास्त पाऊस पडला. पुण्यात ३३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. दुष्काळात होरपळलेल्या औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
दरम्यान मान्सूनचा दक्षिणेकडे प्रवास सुरू असून, पुढील काही दिवसांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या तमिळनाडूमध्येही बरसेल, असा अंदाजही खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला.
परतीच्या मॉन्सूनने उत्तर भारतातील परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. तो आता महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपर्यंत आला आहे. तो उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागातून दक्षिणेकडे सरकला आहे.
पुढील काही दिवसांमध्ये मॉन्सून महाराष्ट्रातून पुढे सरकेल. यादरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका पाऊस झाल्याचे दिसून येते, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.