नागपूर - सर्वच पक्षांच्या प्रचाराचा सोशल मीडियावर भडिमार सुरू आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल तयार केला आहे. या सायबर सेलच्या अहवालानुसार सोशल मीडियावरील उमेदवारांचा मागील काही दिवसांचा खर्च शून्य आहे. त्यामुळे या उमेदवारांनी सोशल मीडियातून माघार तर घेतली नाही, अशीच शंका उपस्थित होत आहे.
निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. लोकसभा मतदारसंघ मोठे आहे. उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी आहे. या कमी वेळात सर्वच मतदारांपर्यंत उमेदवारास पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत आहे. मागील निवडणुकीत या सोशल मीडियातील प्रचाराचा भाजपला मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर नियंत्रणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरून होणारा प्रचार-प्रसार, आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता, निवडणूक आयोगाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्षही तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात एक सायबर सेल तयार केला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा खर्च उमेदवारांच्या खर्चात जोडला जाणार आहे.
या सेलमध्ये सायबरशी संबंधित पोलिस अधिकारी आणि तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातही पाच लोकांचा विशेष सेल तयार केला आहे. हा सायबर सेल रोज आपला अहवाल निवडणूक विभागाला सादर करतो. सायबर सेलच्या एक, दोन दिवसाचा अहवाल उमेदवार आणि त्यांच्याशी संबंधित पोस्टवर झालेल्या खर्चाची माहिती सादर करण्यात आली. मात्र, गेल्या दोन, तीन दिवसांच्या अहवालत उमेदवारांच्या सोशल मीडियावरील खर्च शून्य दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात सोशल मीडियावर उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध पोस्ट टाकण्यात येत असून शेअर, लाइकही करण्यात येत आहे. त्यामुळे सायबर सेल करतेय तरी काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Web Title: Loksabha Election 2019 Social Media Candidate Publicity Expenditure
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.