काल दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून काही बुरखाधारी तरुणांनी विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जबर केली. यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. सर्वच स्तरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्ल्याचा निषेध केलाय. आपले युवक, युवती त्यांच्या वसतिगृहात सुरक्षित नसतील तर हे धक्कादायक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
JNU मधील हल्ला दहशतवादी हल्ला
काल दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जो हल्ला झाला यावर अनेक मतमतांतरं आहेत. असं जरी असलं तरीही कालचा हल्ला हा २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारा होता. बुरख्यामागे लपून ज्यांनी हल्ला केला त्यांचे बुरखे फाटले पाहिजे. आपल्या देशात हे खपवून घेतलं जाणार नाही.
देशातील तरुणांना विश्वासात घेण्याची गरज आहे. देशातील युवांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात, मात्र देशातीलतरुणांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तरुणांच्या मनातील अस्थिरता कमी करण्याची गरज आहे. देशातील विद्यापीठांमधील युवक युवती सुरक्षित नसतील तर हा आपल्या देशावर कलंक आहे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी काळजी करू नका :
महाराष्ट्रात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील तरुणांनी काळजी करू नका. तुमच्या केसाला देखील धक्का लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील युवक आणि युवतींना दिलाय. काल झालेला हल्ला अत्यंत भ्याड हल्ला होता. हे बुरखाधारी डरपोक होते. जर त्यांना कुणाची भीती नव्हती तर त्यांनी बुरख्याआडून हल्ला केला नसता.
त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी :
काल ज्यांनी विद्यापीठात घुसून भ्याड हल्ला केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. काल झालेल्या हल्ल्यानंतर अद्याप पोलिसांनी ठोस पावलं उचललेली पाहायला मिळत नाहीत, यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत, आता पोलिसांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई केली नाही तर त्यांच्या कामावर नक्कीच प्रश्नीचिन्ह उपस्थित होणार आहे. मात्र बुरखाधारी हल्लेखोरांचा बुरखा फाटलाच पाहिजे. जर तसं झालं नाही तर मात्र हा हल्ला स्पॉन्सर्ड होता का ? हे आपल्याला समजेल.
मी या युवकांच्या सोबत
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही. मुंबईत पुण्यात अनेक विद्यार्थ्यांकडून काल झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय. अशात या विद्यार्थ्यांच्या मनात जो उद्रेक आहे तोच माझ्या देखील मनात आहे. मी या युवकांच्या सोबत आहे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
Web Title: maharashtra cm uddhav thackeray condemns attack on the students of JNU says its a terror attack
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.