पुणे : पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपसाठी चिंतेची स्थिती असल्याचे मत राज्यसभेतील पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाची सत्ता जाईल, असा माझा अंदाज होता. मात्र मध्य प्रदेशमध्ये काॅंग्रेसने घेतलेली झेप पाहता 2019 च्या निवडणुकीत भाजपसाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, की पक्षाने विकासाचा मुद्दा सोडून इतर बाबींवर या निवडणुकीत लक्ष दिले. त्यात राम मंदिर मुद्दा, शहरांचे नामकरण, हनुमानाची जात काढणे असे प्रकार झाले. त्याचा मतदारांवर नकारात्मक परिणाम झाला. मी राजस्थानमध्ये निवडणुकीआधी सर्वेक्षण करण्यासाठी गेलो होतो. तेथील सरकारबद्दल नाराजी होती. हे लक्षात आले होते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये काॅंग्रेस 25 जागांवरून शंभऱच्या पुढे जाईल, असे वाटले नव्हते. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे आहे. बूथपर्यंत भाजपची यंत्रणा आहे. चौहान सरकारबद्दल सहानुभूती होती. तरी जनतेने काॅंग्रेसला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे.
या तीन राज्यांतून 65 खासदार निवडून जातात. यापैकी 62 हे भाजपचे आणि तीन फक्त काॅंग्रेसचे खासदार आहेत. जातीपातीचे राजकारण केल्यामुळे 2014 चा मोदींचा विकासाचा अजेंडा मागे पडला. ही स्थिती अशीच राहिली तर 2019 साठी धोक्याची घंटा ठरेल. या परिस्थितीचा पक्षाने गंभीरतेने विचार करायला हवा. हे मी पक्षाचा खासदार म्हणून नाहीतर एक निवडणूक विश्लेषक म्हणून सांगतो आहे, असाही खुलासा त्यांनी केला.
Web Title: Knew about the defeat in Rajasthan Chhattisgarh Says Sanjay Kakade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.