अकोला: बोन्ड अळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यावर्षी मात्र, कापसाला पोषक वातावरण मिळाल्याने उत्पादनात चांगल्या वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी लवकरच म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस घरी आला आहे. मुहूर्तावर कापसाला सव्वा सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने पांढरं सोनं चकाकणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात दानापूर येथे कापसाला सव्वा सहा हजारांचा मुहूर्ताचा भाव मिळाला आहे. दरम्यान यावर्षी 115 ते 120 लाख गाठीचे कापूस उत्पादन होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
शिवाय बाजारपेठेत कापसाला भावही हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये अधिक मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात सर्वाधिक कापूस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अग्रक्रम येतो. मात्र, गेल्या काही वर्षात गुलाबी बोंडअळी, पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी कारणामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात घट जाणवत होती. त्याचा परिणाम देशाच्या एकत्रित कापूस उत्पादनावरही पडला. दरवर्षी विविध संकटांमुळे व नुकसानामुळे कापूस लागवडीवरही परिणाम झाला. त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी खरिपात गेल्या वर्षी पेक्षा दोन लाख 83 हजार 799 हेक्टर कापूस लागवड क्षेत्र घटले असून, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 94 टक्के क्षेत्रावर म्हणजे 39 लाख 41 हजार 464 हेक्टरवर यावर्षी कापूस लागवड करण्यात आली आहे.
परंतु, यावर्षी कापूस पिकासाठी पोषक पर्जन्यमान झाल्याने आणि किडी रोगांचा प्रादूर्भाव तुलनेत कमी असल्याने उत्पादनात वाढीची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे बाजारभाव अधिक म्हणजे साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 115 ते 120 लाख गाठीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.