जळगाव : मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रामुख्याने वादळी वारा व गारपीट झाल्याने केळी बागांचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान केळीचे दर देखील घसरल्याने शेतकऱ्यांना अधिक नुकसान सहन करावे लागत होते. मात्र आता केळीच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशाच्या वर कायम आहे. तर मागील महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. प्रामुख्याने जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे केळी उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले होते. निसवणीच्या अवस्थेतील असलेल्या नवती केळी बागांचे नुकसान झाले होते.
केळीच्या दरातही झाली घसरण
यानंतर केळीच्या दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. किमान १००१ व कमाल २०५० आणि सरासरी १५११ रूपयांपर्यंत असलेले केळीचे भाव ४०० ते ६०० रूपयांनी खाली आले होते. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी काढणीची घाई केली. यामुळे व्यापाऱ्यांनी दर कमी केले होते. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली.
दरात ५०० रुपयांनी वाढ
दरम्यान अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर पुन्हा केळीच्या भावात सुधारणा झाली आहे. खासकरून बऱ्हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १२५ ते १४० गाडी आवक होत असतानाही केळीला कमाल १८०० आणि सरासरी १४५० रूपयांपर्यंत भाव आता मिळत आहे. काही दिवसांपूर्वी येथे सरासरी ११०० रूपयांचा भाव होता. आता केळीच्या भावात साधारण ५०० रूपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.