Marathwada Rain : हिंगोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस, जमिनी खरडल्या, बांध फुटले; धडकी भरवणारा VIDEO
संदीप नागरे, साम टीव्ही हिंगोली
हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांपासून सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. याशिवाय शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली पिके ही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
हिंगोलीच्या नरसी परिसरातील वरुड , कडती सरकळी , वैजापूर यासह नरसी नामदेव शेत शिवारात कापूस सोयाबीन हळद या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदत देण्याची मागणी केली असून शेतकरी मदतीसाठी आर्हा हाक देत आहेत.
औंढा तालुक्यातील भोसी परिसरातील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात शेतातील काळी माती वाहून गेली असून जमिनी खरडून गेल्या आहेत. दुसरीकडे पूर परिस्थितीमुळे व्यापारी वर्गाचं देखील मोठं नुकसान झालंय. या सर्व भागाची पाहणी करून हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आढावा घेतला आहे.
ज्या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले अशा नागरिकांना तातडीने स्वस्त धान्य दुकानातून तातडीने गहू तांदूळ साखर पुरवठा करण्याच्या सूचना खासदार आष्टीकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढला आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा एकदा हिंगोली शहरासह परिसरात पाऊस सुरू झाला असून, या पावसामुळे जिल्ह्यातील पूर्व परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. दरम्यान नागरिकांनी पूर परिस्थिती पासून सावध राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागात नागरिकांसाठी हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.