सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आज शेकडो विद्यार्थी विद्यापीठात धडकले. एनएसयुआय (NSUI – विद्यार्थी काँग्रेस) च्या नेतृत्वाखाली "कॅरी ऑन" आणि पारदर्शक निकालासाठी आंदोलक विद्यार्थी एकवटले.
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, परीक्षा विभागाकडून ग्रेस मार्क्स देताना नियमानुसार केवळ एकूण गुणांच्या दहा टक्के ग्रेस दिला जातो. मात्र, ५० गुणांच्या पेपरमध्ये केवळ ५ ग्रेस मिळू शकतो, तिथे एका विद्यार्थिनीला ९ मार्क असूनही थेट २० गुण देण्यात आले आहेत. म्हणजेच ११ मार्क्स अधिक दिले गेले, यामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे.
या मुद्द्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला. एनएसयुआयचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि शेकडो विद्यार्थी एकत्र येत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत होते.
प्रशासकीय अधिकारी आंदोलक विद्यार्थ्यांना भेटले असून, दोन दिवसांची मुदत द्या, मागण्यांवर विचार करू अशी विनंती केली. मात्र, आंदोलनकर्ते याला तयार नाही. त्यांची ठाम मागणी आहे की, सरकारी आदेश (जीआर) मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.
सध्या काही विद्यार्थी उपोषणावर असून, मागण्या मान्य होईपर्यंत न उठण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांचा निर्धार आणि परीक्षा विभागाच्या मनमानी कारभाराचा विरोध यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.