
IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना काल चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये बंगळुरूचा विजय झाला. विजयामागे आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा मोठा हात होता. कालच्या सामन्यात विराटने दमदार ७० धावा करत अनेक विक्रम रचले. विराटने ऑरेंज कॅपच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
दरम्यान कालच्या सामन्यात विराटचा शानदार खेळ पाहून 'टी-२० क्रिकेट फॉरमॅटमधून विराटने लवकर निवृत्ती घेतली, तो सध्या ज्या लयीत आहे, ते पाहता २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत खेळू शकला असता असे वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने केले आहे. कालच्या सामन्यामध्ये विराटने ४२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. यात ८ चौकार आणि २ षटकार यांचा समावेश होता. या खेळीवर सुरेश रैनाने टिप्पणी केली आहे.
'मला अजूनही वाटते, विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. विराट आता ज्या लयीत खेळत आहे आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानचा त्याचा खेळ पाहता तो २०२६ पर्यंत खेळू शकला असता. त्याने ज्या पद्धतीने फिटनेस मेन्टेन केली आहे, त्यावरुन तो अजूनही त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर असल्याचे दिसते. कोहलीकडे अजूनही भरपूर वेळ शिल्लक आहे. तो सर्वोच्च स्तरावर योगदान देत राहू शकला असता', असे कालच्या बंगळुरू विरुद्ध राजस्थान दरम्यानच्या सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरेश रैना म्हणाला.
२०२४ चा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वर्ल्डकपमध्ये विराटने १५१ धावा केल्या होत्या. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विराटच्या ७८ धावांमुळे टीम इंडियाचा डाव सावरला होता. या सामन्याचा विराट 'प्लेयर ऑफ द मॅच' बनला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.