

संजू सॅमसनने ईडन गार्डन्सवर सामनाविजयी खेळी साकारली.
आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर भारताने विजय मिळवला.
टीम इंडियाचा ईडन गार्डन्सवरील टी-२० रेकॉर्ड भक्कम राहिला.
'पॅराडाइज लॉस्ट 'हे महाकाव्य तुम्ही ऐकून असाल. यात इडन गार्डनमधील आदाम आणि एवा यांनी देवाची आज्ञा मोडल्यानं त्यांना देवाने स्वर्गातील नंदनवनातून बेदखल केलं होतं. पण कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर देवानं संजू सॅमसनला भरभरून यश देत त्यांच्या सहकाऱ्यांकडून कौतुक स्वरुपी पुष्पांचा वर्षाव केला.
ईडन गार्डन्समधील पराभवाची कथा सर्वश्रुत आहे, पण भारतविरुद्धच्या वेस्ट इंडिजच्या सामन्यामुळे ही पराभवाची नव्हे तर विजयाचा इतिहास रचला गेला. ईडन गार्डन्सवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ईडन गार्डन्सवर एकूण ९ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ जिंकले आहेत. आठव्या सामन्याच्या विजयाचा इतिहास रचला गेला तो संजू सॅमसनमुळे.
शानदार खेळी, आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर या पठ्ठ्याने टीकाकारांची तोंडं बंद केली. इतकेच काय कधीकाळी त्यांची टिंगल करणाऱ्या सूर्यकुमार यादवाला सुद्धा त्याच्या खेळी आणि जिद्दीपुढे नतमस्तक व्हावं लागलं. आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कपचा नॉकआउट सामना, जो संघ पराभूत होईल त्याची स्पर्धेतून विकेट पडणार होती.
साखळी सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाला सुपर ८ च्या सामन्यात दोन्ही सामने जिंकणं आवश्यक होतं. यातील पहिला सामना टीम इंडियानं जिंकला होता. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही विजय मिळवणं गरजेचं होतं. त्यात पडत्या विकेट्समुळे वाढता दबाव बघता सामना भारताच्या हातातून जाणार असं अनेकांना वाटलं होतं. सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा बाद झाल्यानंतर शांत झालेलं स्टेडियम त्याची साक्ष होती, पण नाराज झालेल्या चेहऱ्यावर आनंद फुलवला तो संजू सॅमसनच्या खेळीनं.
सामन्यानंतर सॅमसनने त्याच्या सेलिब्रेशनचे वर्णन खूप वैयक्तिक केले. तो म्हणाला की, तो क्षण त्याच्यासाठी कोणत्याही शतकापेक्षा मोठा होता. जिओहॉटस्टारवर पार्थिव पटेलशी बोलताना संजू म्हणाला की हा त्याच्यासाठी खूप खास क्षण होता. त्याला देवावर खूप विश्वास आहे. विजयी धाव घेतल्यानंतर संजू सॅमसन मैदानावर गुडघे टेकून खाली बसला. त्याने त्याचे हेल्मेट काढले आणि आकाशाकडे पाहिले. मग, हात जोडून, त्याने देवाचे आभार मानले, जणू काही हा विजय केवळ एक सामना नव्हता, तर त्याच्या कठोर परिश्रमाचे, संघर्षाचे आणि श्रद्धेचे फळ आहे. ते होतेच म्हणा.
संजू गेल्या काही काळापासून आपल्या फलंदाजीत अपयशी ठरत होता. त्याला मोठी खेळी करताच येत नव्हत्या. त्याच्यावर टीकाही केली जात होती, तर काही जण त्याला डावलं जात होत म्हणून निवड कर्त्यांवर आसूड उगारत. पण आपल्या अशा पडझडीच्या कठीण काळात सॅमसनने स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट केले. कोणता खेळाडू ऑऊट ऑफ फॉर्म असला की सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जाते. संजूबाबतही असेच घडलं. पण त्याने सोशल मीडियापासून स्वत: दूर ठेवत त्याने आपला आत्मविश्वास वाढवला.
भारतीय संघाला विजय कसा मिळवून दिला याबाबत बोलताना संजू म्हणाला, १९६ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांवर दबाव जाणवत होता. विकेट सातत्याने पडत होत्या, परंतु सॅमसनने संयम आणि जबाबदारीने डाव सावरला. ते थोडे कठीण होते. आमच्या फलंदाजीची ताकद पाहता, ईडन गार्डन्सवर १९० धावांचा पाठलाग करता येईल, असं संघातील खेळाडूंना वाटलं. पण नियमित अंतराने विकेट पडत असल्याने ते थोडे आव्हानात्मक बनते.
सॅमसनने सांगितलं की, चांगली सुरुवात करूनही, त्याला त्याच्या नैसर्गिक आक्रमण शैलीवर ब्रेक लावावा लागला. तेथेच त्याच्या अनुभवाने मोठी भूमिका बजावली. दरम्यान भारतीय फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. पण जेव्हा विकेट पडत राहिल्या, तेव्हा त्याला जाणवलं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायचे आहे, आणि नेमके तेच घडले. त्याने तो सामना नाबाद राहत जिंकवला सुद्धा.
संजू म्हणाला की, तो अनेक वर्षांपासून या फॉरमॅटमध्ये खेळत आहे. (विराट) कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी सारख्या अनेक दिग्गजांकडून शिकलो आहे. "त्यामुळे माझ्या अनुभवात मदत झाली. मी पाहिले आहे की हे दिग्गज कसे खेळतात आणि परिस्थितीनुसार ते त्यांचा खेळ कसा बदलतात." “गेल्या सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी करत होतो म्हणून मी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करत होतो, पण या सामन्यात परिस्थिती वेगळी होती. जस जशा विकेट पडत होत्या तशी त्याने आपली जबाबदारी ओळखत मैदानावर टिकून राहणाचा प्रयत्न केला.
सॅमसनने सामना संपल्यानंतर सांगितलं की, आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला मोठी धावसंख्या करायची असते.तो शक्य तितके षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तुम्ही अशा धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा दबावाने भरलेल्या सामन्यात, तुम्ही वेगवेगळे पर्याय वापरता. तुम्ही जास्त जोखीम घेण्याऐवजी अधिक चौकार मारण्याचा विचार करता. त्यामुळे संजूने फलंदाजी करताना वेळेवर लक्ष केंद्रित केले. आणि विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.