

टी २० वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीत पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीवर टीका होत आहे. दुसरीकडं पाकिस्तानी संघाची वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरीकडं दुर्लक्ष करून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताच्या कामगिरीवर आणि गौतम गंभीरवर टीका करताना जहरी टीका केली आहे. गौतम गंभीरने भारतीय संघात राजकारण आणलं आहे, असा आरोप त्यानं केला आहे.
सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर दबाव वाढत आहे. सेमिफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचेल की नाही याबाबत शंका घेतली जात आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवाला कुठेतरी संघातील खेळाडूंची निवड कारणीभूत आहे, असं बोललं जात आहे.
सुपर ८ मधील महत्वाच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न देता वॉशिंग्टन सुंदरला स्थान दिलं. यावरूनही गौतम गंभीरवर टीका होत आहे. या निर्णयावर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आर. अश्विन याच्यासह इतर दिग्गज खेळाडूंनीही प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अहमद शहजाद यानंही गौतम गंभीरला लक्ष्य केलं. 'हारना मना हैं' या शोमध्ये शहजादनं गंभीरवर तोफ डागली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत भारतीय राजकारणात असल्यामुळे गंभीरचे विचार बदलले आहेत. या काळात गंभीर भाजपचा खासदार होता, असं शहजाद म्हणाला.
जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाता त्यावेळी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत असलं पाहिजे. गंभीर राजकारणात गेला. त्यामुळे त्याच्या विचारात बदल झाला. तो राजकारणात यशस्वी झाला नाही. पण तेच राजकारण तो टीम इंडियात सुद्धा घेऊन आला आहे. गौतम गंभीरच्या या राजकारणामुळं भारतीय संघाची प्रतिमा मलिन झाली आहे, असं शहजाद म्हणाला.
गंभीरने संघातील खेळाडूंचा योग्य वापर केला नाही, असाही आरोप त्याने केला. यावेळी त्याने कुलदीप यादवचं उदाहरण दिलं. कुलदीपला वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. संघातील खेळाडूंचा योग्य वापर करून घेतला जात नाही. गंभीर ते चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकला नाही. कुलदीपसारखा मॅचविनर खेळाडू तुमच्याकडे आहे. त्याचा योग्य वापर केला जात नाही, याकडे शहजादनं लक्ष वेधलं.
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कुलदीप आणि सूर्यकुमार यादव यांच्यात कथित वाद झाला. त्यामुळे कदाचित त्याला संधी दिली नसावी. नंतर दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि आपल्यात काही वाद नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण यामागची गोष्ट काही वेगळीच असावी, अशी शंका देखील त्यानं घेतली.
गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं कोणतीही द्विपक्षीय मालिका गमावली नाही. हे खरं असलं तरी, त्यांच्यावर सध्याच्या घडीला दबाव वाढत आहे, असंही तो म्हणाला. दरम्यान भारताचा सुपर ८ मधील दुसरा महत्वाचा सामना गुरुवारी, २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी 'करो वा मरो' असाच असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.