आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या संघाने साखळी फेरीतील २ सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचा तिसरा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना गमावताच पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. दरम्यान या सामन्यात पाऊस पडला, तर काय होणार? जाणून घ्या.
रविवारी (९ जून) झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेर भारतीय संघाने बाजी मारली आणि ६ धावांनी हा सामना खिशात घातला. या सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यातही पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानची गुणतालिकेतील स्थिती पाहिली, तर या संघाला अजूनपर्यंत एकही गुणाची कमाई करता आलेली नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने दोन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे धुतला गेला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असे झाल्यास पाकिस्तानचा संघ पुढील सामना जिंकून केवळ ३ गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्ये पोहचू शकणार नाही.
पाकिस्तानचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. सध्या हा संघ एकही गुणाची कमाई न करता गुणातालिकेत सर्वात शेवटी आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट हा -०.१५० वर घसरला आहे. जर पाकिस्तानला सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरीत दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यासह इतर संघांच्या निकालावर देखील अवलंबून राहावं लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.