
Kho Kho Worldcup 2025 : भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर नाव कोरले आहे. दिल्लीमध्ये आज (१९ जानेवारी) पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ या दोन देशांचे संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यामध्ये बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळवर ३८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
भारतीय महिला खो-खो संघ पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धेमध्ये वरचढ ठरत होता. पहिल्या सामन्यात महिला संघाने तब्बल १७६ गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारतासमोर नेपाळचे आव्हान होते. हे आव्हान स्विकारुन महिला संघाने पहिल्या खो-खो विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.
अंतिम सामन्यात पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय महिला संघ आघाडीवर होता. तेव्हा ३४-० च्या अंतराने नेपाळचा संघ पिछाडीवर होता. पुढे नेपाळच्या महिला खेळाडूंनी दबाव टाकत गुणसंख्या ३५-२४ वर नेली. दुसऱ्या टप्प्यावर काहीसा वरचढ ठरलेला नेपाळचा संघ तिसऱ्या टप्प्यात मागे पडला. तर भारताच्या लेकींनी पुन्हा आघाडी घेत आणखी ३८ गुण मिळवले.
चौथ्या टप्प्यात नेपाळने आक्रमणाला सुरुवात केली. पण भारतासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघाने ७८-४० अशा गुणांच्या फरकाने नेपाळच्या महिला संघावर मात केली आणि पहिल्या खो-खो विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. महिला गटाचा अंतिम सामना संपल्यानंतर पुरुषांचा अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.