

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु दाट धुक्यामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. बराच वेळ हवामान सुधारण्याची प्रतिक्षा करण्यात आली. पण रात्रीचे १० वाजपर्यंत हवामानात कोणतीच सुधारणा न झाल्यानं अखेर सामना रद्द करण्यात आला.
सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार होती. पण दाट धुक्यामुळे नाणेफकीला उशीर झाला. त्यानंतर सामना ९:३० वाजता पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला परंतु धुके वाढतच गेले. दरम्यान हवामानात सुधारणा झाली का नाही खेळ खेळण्यास वातावरण चांगले आहे का हे जाणून घेण्यासाठी अंपायर सहावेळा मैदानावर आले. त्यांच्यासोबत राजीव शुक्लाही आले होते. मात्र सामना खेळण्यासाठी हवामान चांगले नसल्यानं त्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. जवळपास साडेतीन तास प्रतिक्षा केल्यानंतरही सामना सुरू होऊ शकला नाही. टीम इंडिया मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अहमदाबादमधील सामना आता मालिकेसाठी महत्त्वाचा असणार आहे.
टी-२० विश्वचषकाला दोन महिन्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. विश्वचषक मोहीम ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधी टीम इंडियाला आता फक्त सहा टी-२० सामने खेळायचे आहेत. एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि उर्वरित पाच सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. अशा परिस्थितीत हा सामना रद्द होणे हा टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही मोठा धक्का मानला जातोय.
हा सामना रद्द झाल्यानंतर भारतासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा उपकर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. गिलला एका महिन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीत त्याच्या मानेला दुखापत झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.