
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये दुसरा विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीला त्याच्या घरच्या स्टेडियमवर मात दिली. दिल्लीचा करुण नायर आक्रमक खेळी करत असताना रोहित शर्माने डगआउटमधून चेंडू बदलण्याची सूचना केली. सूचनांचे पालन करत हार्दिक पंड्याने नवा चेंडू घेतला आणि कर्ण शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात बोलावले. डगआउटमध्ये बसलेल्या रोहित शर्माने दिलेल्या सूचनांमुळे मुंबईचा विजय झाला असे अनेकजण म्हणत आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबई ही रोहित शर्मामुळे जिंकली असे अनेकांचे मत आहे. पण या विजयाचे श्रेय रोहित शर्माला नाहीतर कर्णधार हार्दिक पंड्याला मिळायला हवे असे भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. सामना संपल्यावर सुरु असलेल्या चर्चेत संजय मांजरेकर सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांनी मोठं वक्तव्य केले.
'विजयाचे श्रेय रोहित शर्माला मिळाले. ते कर्ण शर्माला मिळायला हवे, हार्दिक पंड्याला मिळायला हवे. सूचना देण्यासाठी बरेच लोक असतात पण निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर सर्वकाही अवलंबून असते. हार्दिकने रोहितचा सल्ला ऐकला ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही इथेही रोहितला श्रेय दिले आणि हार्दिक पंड्याला दिले नाही, तर ते चुकीचे ठरेल. जर सजेशन, सूचना अयशस्वी झाली असती, तर तुम्ही हार्दिक पंड्याला दोष दिला असता,' असे संजय मांजरेकर म्हणाले.
बाहेरुन सूचना देणे सोपे असते. या विजयाचे संपूर्ण श्रेय हार्दिक पंड्याला द्यायला हवे. हार्दिक पंड्या भावनिक झाला होता. मुंबई इंडियन्सची अलिकडची परिस्थिती पाहता हा विजय हार्दिकसाठी किती महत्त्वाचा होता हे समजते. त्याच्यासाठी हा प्रवास कठीण होता. सोशल मीडिया आणि इतर लोक म्हणत आहेत की रोहितच्या सूचनांमुळे मुंबई इंडियन्सचा विजय झाला. पण ते चुकीचे आहे. हार्दिक पंड्या कर्णधार आहे आणि कुणीही सूचना दिल्या तरी हार्दिकच निर्णय घेतो असे वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.