
दक्षिण अफ्रिका अ विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा झाली. या संघातून डोमेस्टिक क्रिकेटपटू सरफराज खानला वगळण्यात आलं. सरफराजची खानची संघात निवड न केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. ओवैसी यांनी सरफराज खानची भारत अ संघातही निवड का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला.
आता, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी निवड प्रक्रियेत धार्मिक पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. शमा मोहम्मद यांनी सरफराज खानला संघातून वगळल्याबद्दल टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रवक्त्यांचा गौतम गंभीरवर आरोप
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सरफराज खानची भारत अ संघात निवड न झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत विचारले की, "सरफराजची निवड त्याच्या आडनावामुळे नाही झाली का? #JustAsking, या मुद्द्यावर गौतम गंभीरची भूमिका आम्हाला माहिती आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी शमा यांच्या प्रश्नाचे समर्थन केले, तर काहींनी त्यावर टीका केली.
याआधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सरफराज खानची निवड न करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'सरफराज खानची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरासरी ११० आहे. त्याने त्याच्या फिटनेसवरही काम करत १७ किलो वजन कमी केले आहे आणि इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध धावा केल्या आहेत. तरीही, त्याला का दुर्लक्षित केले गेले? असा प्रश्न एआयएमआयएम पक्षाचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी केला.
भाजपचा कांग्रेसवर हल्लाबोल
भाजपचे प्रवक्ते सीआर केशवन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, 'काँग्रेसची ही विचारसरणी त्यांची फूट पाडणारी मानसिकता दर्शवते. काँग्रेस आता धर्माच्या आधारावर भारतीय क्रिकेट संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे निंदनीय आहे'.
रोहित शर्मावरही वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यापूर्वी त्यांच्या रोहित शर्मावरील पोस्ट आणि विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. शमा यांनी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि त्याला बॉडीशेम केले होते. शमा यांच्या ट्विटमुळे बराच गोंधळ उडाला होता, त्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली. जेव्हा रोहित शर्माने अंतिम सामन्यात ७६ धावा करून भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली, तेव्हा शमा यांनी हिटमॅनचे कौतुक देखील केले.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा केली. विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे सामने बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणार आहेत. पहिला सामना ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे, तर दुसरा ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. देशांतर्गत सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही, सरफराज खानला पुन्हा एकदा दोन्ही संघांकडून दुर्लक्षित करण्यात आल्याने चाहते आणि किक्रेट विश्लेषकांमध्ये वाद सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराज खान आपल्या फिटनेस आणि फॉर्म सुधारण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याने १७ किलो वजन कमी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.