
राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांची बिहारमध्ये व्होट अधिकार यात्रा
याआधी भारत जोडो आणि न्याय यात्रा काँग्रेससाठी ठरल्या होत्या फायदेशीर
बिहारमधील २३ जिल्ह्यांतून यात्रा निघणार
बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यशस्वी ठरणार का?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो, न्याय यात्रा काढली होती. आता बिहारमध्ये व्होट अधिकार यात्रा काढली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी भारत जोडो आणि न्याय यात्रा काढली होती. आता बिहारच्या विधानसभा निवडणुकांआधी व्होट अधिकार यात्रा काढली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास या यात्रेतून करणार आहेत. अनेक जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींची ही यात्रा हिट झाल्याचं मानलं जात होतं. हाच प्रयोग बिहार निवडणुकीआधी करण्यात येत आहे. पण ही यात्रा बिहार निवडणुकीत इंडिया आघाडी राजकीय गणितं बदलणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मागील वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला असता, राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघांतून यात्रा काढली होती, त्यातील ४१ जागांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला होता. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ७१ मतदारसंघ पिंजून काढले होते. तर न्याय यात्रेच्या माध्यमातून ८२ मतदारसंघात मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला होता. याचाच अर्थ एकूण १५३ मतदारसंघांतून ही यात्रा निघाली होती. त्यातील ४१ मतदारसंघांत इंडिया आघाडीला विजय मिळाला होता.
राहुल गांधींची ही यात्रा बिहारमधूनही काढण्यात आली होती. सात मतदारसंघ या यात्रेच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले होते. त्यात काँग्रेसने तीन जागांवर निवडणूक लढवली होती. सर्व जागा जिंकल्या होत्या. तर सहकारी पक्षांनी दोन जागांवर विजय मिळवला होता. देशभरातही या यात्रेमुळं काँग्रेसच्या जागा वाढल्याचं सांगण्यात येतंय. मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला ५० चा आकडाही गाठता आला नव्हता, त्याच काँग्रेसनं २०२४ च्या निवडणुकीत यापेक्षा जास्त जागा जिंकल्या. इतकेच नाही तर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसला मिळालं.
बिहारमध्ये नितीशकुमार यांचं सरकार आहे. ही सत्ता उलथून काबिज करण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचा मानस आहे. स्वतः राहुल गांधी फ्रंटफुटवर आले आहेत. निवडणुकीआधी व्होट अधिकार यात्रा काढली आहे. जनतेला त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक करण्याचा यामागचा उद्देश आहे. लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. तसेच बिहारमधील एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणीवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे.
व्होट चोरीच्या मुद्द्यावर सरकार आणि निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न या व्होट अधिकार यात्रेतून करण्यात येत आहे. बिहारच्या २३ जिल्ह्यांमधून ही यात्रा काढण्यात येत आहे. सासारामनंतर ही यात्रा औरंगाबाद, गया, नालंदा-नवादा, शेखपुरा, लखीसराय, मुंगेर, भागलपूर, पूर्णिया, कटिहार आदी भागांमधून जाणार आहे. व्होट अधिकार यात्रेचा हा प्रयोग बिहारच्या निवडणुकीत यशस्वी ठरणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.