
पुण्यात कारगिल युद्धातील माजी सैनिक हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबावर ८० जणांच्या जमावाने हल्ला केला.
त्यांना 'बांग्लादेशी' म्हणून संबोधून नागरीकत्वाचे पुरावे मागण्यात आले.
माजी सैनिकाच्या कुटुंबावर अपशब्द वापरण्यात आले व धमकी देण्यात आली.
या घटनेमुळे माजी सैनिकांचा सन्मान, नागरीक हक्क आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. माहितीनुसार, कारगिल युद्धात आपलं शौर्य दाखवणाऱ्या एका सैनिकाला शिवीगाळ केल्याची घटना पुण्यातील चंदनगर भागात घडलीय. कारगील युद्धात देशासाठी लढणाऱ्या माजी सैनिक हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबियांना बांगलादेशी म्हणत त्यांच्या कुटुंबियांकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा मागण्यात आला. बांगलादेशी म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यात आलीय.
पुण्यातील चंदनगर भागात माजी सैनिक हकीमुद्दीन शेख राहतात. त्यांनी भारतासाठी कारगिल युद्धात आपलं शौर्य दाखवलंय. भारतासाठी रक्त सांडणाऱ्या माजी सैनिकांच्या घरावर मध्य रात्री ८० जणांच्या टोळीनं धावा बोलत त्यांना शिवीगाळ केली. माजी सैनिकांच्या कुटु्ंबियांना बांगलादेशी म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडे ते भारतीय असल्याचा पुरावा मागितला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, शिवाय माजी सैनिकांच्या प्रतिष्ठेवर आणि नागरी हक्कांवरही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे वृत्त आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ८० हून अधिक लोकांनी जोरात दार वाजवण्यास सुरुवात केली. काही लोक घरात घुसले आणि आधार कार्ड मागू लागले." जेव्हा कागदपत्रे दाखवण्यात आली तेव्हा ती बनावट असल्याचे सांगितलं. त्याचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून येथे राहत आहे. त्याचे तीन नातेवाईक सैन्यात आहेत, असं जेव्हा सैनिकांच्या कुटुंबियांनी सांगितलं तेव्हा महिला आणि मुलांकडूनही कागदपत्रे मागण्यात आले. हकीमुद्दीनचा भाऊ इर्शाद शेख म्हणाला, "आम्ही भारतीय आहोत. गरज पडल्यास, आम्ही ४०० वर्षे जुने पुरावे देखील देऊ शकतो."
आमचे काका १९७१ च्या युद्धात जखमी झाले होते. तर दुसरे काका १९६५ मध्ये अब्दुल हमीदसोबत पाकिस्तानविरोधात युद्ध लढले होते. इर्शादचा दावा आहे की साध्या वेशात दोन पोलिस तिथे उपस्थित होते पण त्यांनी काहीही केले नाही. जेव्हा आम्ही तक्रार घेऊन चंदननगर पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आम्हाला ताटकळत ठेवलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगितले, असं इर्शाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. कोणत्याही टोळी घरात घुसली नव्हती. “शहरात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडील कागदपत्रात कोणतीच गडबड दिसली नाही. दरम्यान हकीमुद्दीन शेख हे भारतीय सैन्याच्या इंजिनिअर्स रेजिमेंटमध्ये हवालदार होते. त्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला आहे. ते २००० मध्ये निवृत्त झाले असून ते सध्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे राहतात, तर त्यांचा धाकटा भाऊ इर्शाद शेख गेल्या ६० वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.