उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह वेगळाच असतो. मात्र उत्तरप्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यावर शाळेत जात असताना एका चिमुकल्याचा सायलंट अटॅकने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बाराबांकी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा विद्यार्थी ७वीत शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तरप्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यातील सेंट अँथनी शाळेत इयत्ता ७वीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या अखिल प्रताप सिंग हा मंगळवारी सकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पहिल्यांदा आपल्या वडिलांसोबत शाळेत पोहचला. अखिलच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, अखिल पूर्णपणे निरोगी होता आणि त्याला कोणताही आजार नव्हता किंवा तो कोणतेही औषध घेत नव्हता. गाडीतून उतरल्यानंतर अखिलने त्याची बॅग खांद्यावर लटकवली आणि शाळेच्या गेटकडे निघाला, तेव्हा अचानक तो जमिनीवर बेशुद्ध पडला.
त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला लखनऊमधील चंदन रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. दुर्दैवाने, अखिलचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचता क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अखिलच्या अशा अचानक जाण्याने अखिलची आई कोलमडली असून कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. वडील जितेंद्र प्रताप सिंह म्हणाले की त्यांचा मुलगा पूर्णपणे निरोगी होता आणि शाळा सुरू झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी सकाळी उत्साहाने घराबाहेर पडला होता. इतक्या लहान वयात अचानक झालेल्या मृत्यूमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.
सुरुवातीला हा सायलंट अटॅक असल्याचे सांगितले जात आहे, परंतु कुटुंबाने दुपारी पोस्टमार्टमशिवाय अखिलवर अंत्यसंस्कार केल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे. दरम्यान या घटनेने शाळेतील शिक्षकांसोबत अखिलच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा दुःख व्यक्त केलं आहे. अखिलच्या कमी वयात झालेल्या मृत्यूने परिसर हादरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.