
अक्षय बडवे, साम टीव्ही
गुपचुप वरिष्ठांशी बोलून निधी घेतात, सगळ्यांनी आपलं दुकान मांडलय, स्वार्थाची पोळी भाजणं बंद केलं पाहिजे, ही वाक्य आहेत पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपची! एकाबाजूला पक्ष संघटना वाढावी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेते राज्यातील अनेक जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पक्षातीलच काही पदाधिकारी नाराज असल्याचे समजत आहे. नुकत्याच पुण्यात संवाद बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांची नाराजी व्हॉट्सॲप ग्रुपमधून व्यक्त केली आहे.
पुण्यात २ दिवसांपूर्वी संपर्क नेते उदय सामंत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे, नुकताच पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थितीत होते.
यावेळी सगळ्या प्रमुख नेत्यांनी भाषणं केली. भाषणाचा सारांश जर बघितला तर जवळपास सारखाच होता ते म्हणजे पक्ष संघटना मजबूत करणे. पक्ष वाढला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा, फील्डवर काम करा तसचं सभासद नोंदणी देखील झाली पाहिजे, या स्वरूपाचे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. याच बैठकीत पवारांच्या बारामतीमध्ये शिवसेना कशी उभी राहील आणि पक्ष संघटना कशी वाढली जाईल, यावर सुद्धा मुद्दे मांडण्यात आले. आमदारांचे भाषणे झाली, संपर्क मंत्र्यांचे मार्गदर्शन झाले, माध्यमांशी संवाद साधला गेला, फोटो, व्हिडीओ, रिल्स पण झाल्या. मात्र, ज्या बैठकीला "संवाद बैठक" नाव दिलं होतं त्याठिकाणी कार्यकर्त्यांनाच बोलू दिलं नाही, अशी खंत स्वतः पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात "शिवसेना कार्यालय पुणे शहर" नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. ज्यामध्ये पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी आहेत. संवाद बैठक पार पडल्यानंतर रात्री एका पदाधिकाऱ्याने "स्वार्थासाठी पक्षात आलेल्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना धमकी देऊ नये, नवीन आले म्हणजे फार काही पराक्रम केला नाही....", असा भला मोठा मेसेज त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर केला. या मेसेजला रिप्लाय म्हणा किंवा संधी शोधणे म्हणा, आणखी एका पदाधिकाऱ्याने "आमचे गाराणे सांगायचे कोणाला? आपला सत्तेत राहून उपयोग काय" असा मेसेज केला.
"कालचा संवाद मेळावा हा कार्यकर्त्यांशी झाला, परंतु कार्यकर्त्याला बोलायला दिले गेले नाही" अशी व्यथा एकाने ग्रुपवर व्यक्त केली. यात आणखी एका कार्यकर्त्याने उडी घेतली आणि त्याने, "जो तो आपली कातडी वाचवतात. गुपचुप वरिष्ठांना गोड बोलून निधी घेतात काम करून घेतात" असा आरोप सुद्धा केला. "बाळासाहेब असताना पुण्यात २१ नगरसेवक होते, आता वीस वर्षात फक्त २ नगरसेवक राहिले. हे सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार नाहीत, यांना त्यांच्या मर्जीतले लोकं लागतात, खऱ्या कार्यकर्त्याला शेवटपर्यंत न्याय भेटत नाही" अशी खंत एका कार्यकर्त्यांनी ग्रुपवरच मांडली.
आता व्हॉट्सॲपवरचे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ग्रुपवर केलेले मेसेज व्हायरल झाले. हे कुणी केले? का केले? याचं उत्तर हे ग्रुपमधील काही पदाधिकारी नक्की देऊ शकतात. मात्र, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉट्सॲपवर झालेल्या या चर्चेची दखल पक्ष घेणार का? पुणे जिल्ह्याचे (जिल्हा आणि शहर) संपर्क मंत्री म्हणून नियुक्त झालेले उदय सामंत यांच्याकडून या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.