Sanjay Raut vs Eknath Shinde : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यातील शिंदे-फडणवीस फडणवीस सरकार कोसळणार असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. इतकंच नाही तर सरकार पडणार असल्याची माझ्याकडे पूर्ण माहिती असून मला याची खात्री देखील असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या विधानामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यातील राजकारणात कोणता भूकंप येणार? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
विशेष बाब म्हणजे, भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत एक खळबळजनक विधान केलं होतं. उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं.
रावसाहेब दानवे यांच्या याच विधानाचं समर्थन करत संजय राऊत यांनी येत्या दोन महिन्यांत राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार कोसळेल असं विधान केलं आहे. संजय राऊत म्हणाले, की रावसाहेब दानवे हे कधीकधी चूकुन खरं बोलून जातात. ते आमचे चांगले मित्र आहे. यावेळी ते खरं बोलून गेले. 'राज्यात दोन महिन्यांनंतर एक वेगळंच चित्र असेल, म्हणजे एक तर मध्यावती निवडणुकीची घोषणा होऊ शकते, हे सरकार पडू शकतं. तसे त्यांनी संकेत दिलेले आहेत'.
पुढे बोलताना, संजय राऊत म्हणाले, की 'राज्यातील सरकार १०० टक्के पडणार याचे माझ्याकडे पूर्ण माहिती असून त्याची मला खात्री देखील आहे'. खासदार संजय राऊत हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत सीमाप्रश्नावर भाष्य केलं. तसेच त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics)
रावसाहेब दानवे काय म्हणाले होते?
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला. शिवसेनेच्या पोटात पहिल्यापासून काळे होतं. अडीच वर्षे सरकार चालवले, कुणालाही वाटत नव्हते, ते सरकार जाईल पण अशी जादू झाली की एका रात्रीत शिवसेनेचं सरकार गेलं. असं रावसाहेब दानवे म्हणाले.
असंच राजकारण चालल्यावर आणखी दोन महिन्यानंतर काय होणार आहे, याचा अंदाज कोणी लावला का? तर नाही ना, उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं म्हणत दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.