पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
४ ही प्रमुख धरणांमध्ये २९.१३ टीएमसी म्हणजे ९९.९४% पाणीसाठा जमा
टेमघरच्या पाणलोट क्षेत्रात ३,११० मिमी, तर पानशेतमध्ये २,२६१ मिमी पावसाची नोंद
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३% अधिक पाणीसाठा उपलब्ध
पुणेकरांसाठी यंदाचा पावसाळा दिलासादायक ठरला असून, शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता तूर्तास मिटली आहे. पुणे जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणासह चारही प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून तब्बल २९.१३ टीएमसी म्हणजेच ९९.९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराला वर्षभर पुरेल इतके पाणी उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.
पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची संततधार आणि धरणांमध्ये पाण्याची आवक कायम असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत शहराला वर्षभर पुरेल इतके सुमारे १८ दशलक्ष घनफूट पाणी खडकवासला सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रातही पाण्याचा प्रवाह वाढला आहे.
यंदाच्या हंगामात चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. खडकवासला येथे ७४६ मिमी, पानशेत येथे २,२६१ मिमी, वरसगाव येथे २,११२ मिमी, तर टेमघर येथे तब्बल ३,११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये सातत्याने पाण्याची आवक होत राहिली.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये सुमारे ३ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात झालेल्या या समाधानकारक पावसामुळे आगामी वर्षभरासाठी पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने प्रशासनाकडून विसर्गावर लक्ष ठेवले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.