पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
शहरात तूर्तास पाणीकपात नाही
अंतिम निर्णय पुढील आठवड्यात
पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीपातळीत वाढ
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने सध्या तरी पाणीकपात लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने काहीशी निराशा केली होती. त्यामुळे शहरातील पाणीस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये सुमारे १६.६४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून तो समाधानकारक मानला जात आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ७ ते १२ जुलै या कालावधीत पाणीकपात स्थगित केली होती. ही मुदत रविवारी संपणार असून सोमवारपासून पुन्हा पाणीकपात लागू होणार का? याबाबत शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अनेक भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याची पाणीस्थिती लक्षात घेता महापालिकेने तातडीने कोणताही कठोर निर्णय न घेण्याचे संकेत दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध साठा आणि आगामी पावसाचा अंदाज यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.
यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेते, प्रशासन आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत धरणांतील पाणीसाठा, शहराची पाण्याची गरज आणि पावसाची परिस्थिती यांचा विचार करून दिवसाआड पाणीपुरवठा करायचा की नियमित पुरवठा सुरू ठेवायचा, याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.