
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले नसून सरकारने लवकर निर्णय घेण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. एकीकडे मराठा बांधवांचा लढा तीव्र होत असतानाच आत्महत्यांचे सत्र वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी घेत ६५ वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आणखी एक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. समाजाला आरक्षण मिळत नाही आणि मुलाला नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी आपले आयुष्य संपवले. पुण्याच्या (Pune) आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. व्यंकट ढोपरे हे नऱ्हे आंबेगावचे रहिवासी असून ते काल दर्शनासाठी आळंदीला आले होते.
घरातून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना एक चिठ्ठी आढळली. ज्यामध्ये आरक्षणासाठी मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतोय, 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाला आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता. (Latest Marathi News)
तसेच बाळा तुझ्या आईला विसरू नकोस.. असेही यामध्ये म्हणले होते. ही चिठ्ठी पाहून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांच्या तपासात आळंदीमध्ये (Alandi) नदीशेजारी त्यांची पिशवी आणि मोबाईल आढळून आला.
त्याच बंधाऱ्यात शोध घेतला असता अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)