महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्दी रिलेशन हरवत चालल्याची तावडेंची खंत
बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या काळातील राजकीय संस्कृतीची आठवण
अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्व, साहित्यिक योगदानावर भाष्य
पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने परखड राजकीय वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्थी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं आहे. एकेकाळी बाळासाहेब, शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण सहकुटुंब एकत्र जेवायचे असं स्पष्ट मत भाजप चे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केलं. मोरया प्रकाशनातर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या 'अटलजी व्रतस्थ याज्ञिक' या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते आज पुणे पुस्तक महोत्सवात पार पडले. एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मोरया प्रकाशनाचे कौस्तुभ देव यावेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, "पुणे पुस्तक महोत्सव हे भव्य होऊ शकतो हे आधी पटले नव्हते. मी राज्याचा सांस्कृतिक, शिक्षणमंत्री होतो. पुस्तक महोत्सवाला पुणेकर दाद देऊ शकतात कारण दोन वर्षांतच महोत्सवाला प्रतिष्ठा मिळणे यात सर्व श्रेय पुणेकरांना आहे. साहित्य संमेलनाला अनेक वर्षे गेलो, तिथे हल्ली कोणी वाचत नाहीत असे म्हटले जायचे. वाचकांना पुस्तके हवी आहेत, त्यांच्यापर्यंत पुस्तके नेली पाहिजेत."
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी बोलताना तावडे म्हणाले, "अटलजी जितके राजकीय नेते होते, तितकेच ते साहित्यिक आणि कवी सुद्धा होते. गीतरामायणाच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात एकही राजकीय वाक्य नाही इतकचं नाही तर मुंबईत आल्यावर अटलजी शिवाजी मंदिरला मराठी नाटक पाहायचे. अशा व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी उलगडून सांगणे महत्त्वाचे आहे. त्यातून नव्या पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत."
"मुशर्रफ यांच्या बरोबर आग्रा येथील समिट अयशस्वी ठरली होती पण, किसीने छेडा तो छोडेंगे नही" हे अटलजींनी कारगिल युद्धावेळी दाखवून दिले होते. पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही. कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते," असं सुद्धा तावडे म्हणाले.
राजकारणात 'हेल्दी रिलेशन' आज राहिलेले नाही. मीही विरोधी पक्षनेता होतो. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार प्रखर टिका करायचे, पण जेवायला एकत्र असायचे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपण नीट अभ्यासले पाहिजेत. अटलजींनी त्यांच्या काळात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. गावापर्यंत रस्ते बांधले, सुवर्ण चतुष्कोन निर्माण केला.
तावडे म्हणाले, "हेल्थी रिलेशन असायचे पण विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा कर्तृत्व होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्थी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं. ज्या प्रकारची हमरी तुमरी होते, सकाळी ९ वाजता भोंगा वाजतो त्याला उत्तरं दिली जातात. मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, मी मुख्यमंत्री यांच्यावर तडाखून टीका करायचो. अधिवेशन सुरू असताना जोरदार टीका व्हायची. मधल्या सुट्टीत म्हणजेच जेवणाची सुट्टी झाली की मी माझ्या केबिन मध्ये मुख्यमंत्री त्यांच्या केबिन मध्ये जायचे. मला मुख्यमंत्री यांचा शिपाई चिठ्ठी घेऊन यायचा 'तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे की जेवायला येणार का?' मी जेवायला जायचो. पुन्हा सभागृहात आलो की पुन्हा टीका."
"मुख्यमंत्री उभे रहायचे आणि म्हणायचे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे इथे मराठी माणूस खाल्ल्या मिठाला जागतो असे कसे विरोधी पक्ष नेते? मी उभा राहिलो महोदय मी सुद्धा महाराजांचा मावळा आहे, शाहू फुलेंचा अनुयायी आहे, चिठ्ठी काढत दाखवली की 'तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे, मीठ वहिनींचे होते' असे खेळीमेळीचे वातावरण होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण जेवण सहकुटुंब करायचे. अटल जी यांचे विविध पैलू तरुण पिढीने घेतले पाहिजे", असं ही तावडे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.