Mumbai News : मोदी सराकारने (Modi Government) बांधलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींना कार्यक्रमाला न बोलावल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'नव्या संसद भवनाची देशाली गरज होती का? असा सवाल करत संजय राऊत यांनी मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या नावाच्या पाट्या लावण्यासाठी संसद भवनाची निर्मिती केली असल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'संसदेची सध्याची इमारत ही क्रांतीकारी आणि ऐतिहासिक आहे. पहिले सरकार या इमारतीत स्थापन झाले होते. अनेक क्रांतीकारी आणि स्वातंत्र्यसैन्यांच्या पदस्पर्शाने ही इमारत पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटना या इमारतीमध्ये घडल्या. ही इमारत आणखी 100 वर्षे चालली असती. पण यापेक्षाही जगभरामध्ये संसदेच्या अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींपेक्षा आपली इमारत ही नवीन होती. तरी देखील त्यांनी ही नवी इमारत बांधली.'
यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'देशाच्या राष्ट्रपतींना डावलण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रपती या देशाच्या संविधानाच्या प्रमुख आहेत. राष्ट्रपतीच्या हस्ते संसदभवनाचे उद्घाटन करणे हे प्रोटोकॉल आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करुन ते याचे पॉलिटिकल इव्हेट करत आहेत.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसंच, 'आम्ही एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले असे चित्र त्यांनी जगासमोर उभं केलं. संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का नाही बोलावले याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. तसंच, देशाच्या राष्ट्रपतींना डावलण्यामागचे कारण काय? याचे उत्तर देखील त्यांनी द्यावे.', असे संजय राऊत यांनी सांगितले. 'आम्ही पहिल्यांदा आदिवसी महिलेला राष्ट्रपती बनवले असे सांगणाऱ्या मोदींना देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन करताना राष्ट्रपतींची आठवण का झाली नाही?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांनी पुढे सांगितले की, 'आम्ही सर्व विरोधी पक्ष आदिवासी महिलेला राष्ट्रपतीला डावलल्याबद्दल संसद भवन उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकतो. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहोत. तुम्ही आम्हाला मूर्ख समजू नका, तुम्ही मूर्ख आहात. इतिहास काहीही न करता बदलता येतो. जुन्या ऐतिहासिक इमारती पाडून नव्या इमारती बांधून त्याच्या पायाभरणीला आणि उद्घाटनाला आपल्या नावाच्या पाट्या लावायच्या याच्यापलिकडे या कार्यक्रमाला काहीच महत्व नाही.', अशी टीका संजय राऊतांनी केली.
'देशाची आर्थिक परिस्थिती खराब असताना लाखो- कोट्यवधी रुपये खर्च करुन यांनी संसदेची निर्मिती केली. फक्त पंतप्रधानांच्या इच्छेसाठी ही इमारत तयार करण्यात आली. मोदींच्या नावाची पाटी लावण्यासाठी फक्त या इमारतीसाठी खर्च करण्यात आला.' , असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.