
मुंबई : आज गुडीपाडव्याच्या मुर्हूतावर मनसेचा मेळावा पार पडत आहे. पक्षाने कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केलीय. पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या आगमनाआधी पक्षातल्या अनेक नेत्याचं भाषण त्याठिकाणी झालं. मात्र, नाशिक मनसेचे नेते दिनकर पाटील यांच्या भाषणाने मनसेची सभा गाजली. त्यांच्या नाशिकच्या स्टाईलने त्यांनी विरोधीपक्षाचे वाभाडे काढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
भाषण करताना ते म्हणाले की, राजकारणात मला ४५ वर्ष झाले. ३४ वर्ष काम केलं, ११ वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं. ११ वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं. क्रिकेटसारखं 'युज अँड थ्रो'. मात्र, राज ठाकरे यांनी मला विधानसभेची उमेदवारी देताना ११ मिनिटांत उमेदवारी दिली. मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण निवडणुका कशा जिंकल्या हे आम्हाला राज ठाकरेंनी सांगितलंय. तुम्ही खोटेपणाने निवडून आलात. EVM मशीन मॅनेज केलं. राजू पाटील, अमित ठाकरे आणि आमच्यासारखे निवडून येणारे आमदार, तुम्ही फक्त मशिनमुळे निवडून आलात, असं म्हणत दिनकर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितलं की, खोक्याचं काय घेऊन बसले, सर्व खोक्यात जाऊन बसलेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे, आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर त्या फक्त भारतात होत आहेत. त्यातल्या त्यात या आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात जास्त आहे. मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो तेव्हा असं वाटतं की, ते भांडायला उठलेत. या राज्यात सर्व जातीपातीचं, पक्षाचं आणि दंगलीचं राजकारण सुरुय. आपल्या मागे एवढे मोठे हिंदू हृदयसम्राट राज ठाकरे असल्यावर घाबरायचं नाही, असं आवाहन यावेळी दिनकर पाटलांनी केलं.
ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आलात, त्यांना सांगितलं पिककर्ज माफ करु. त्यांचच अन्न खातात, त्याला तरी जागा. त्यांना सांगतात पिककर्ज माफ करायला आमच्याकडे पैसे नाही, असं सांगतात. लाडक्या बहिणींचे मतं घेतली, त्यांना २१०० रुपये कबुल केले आणि त्यांना मात्र १५०० रुपये देताय. किती लबाड आहेत हे लोकं. मी ५ फूट माणूस आहे, पण मी राज ठाकरेंमुळे ७ फूट झालोय. आता मी ठरवलंय राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर घालवायचं. ४५ वर्ष या लोकांनी काहीच दिलं नाही मला. साहेबांनी उमेदवारी दिली, दोन सभा घेतल्या, एवढ्या मोठ्या सभा झाल्या. तुम्हाला जर वाटलं की राजकारण करायचं आहे, तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडांचा पक्ष आहे तो, आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय, असं म्हणत दिनकर पाटील यांनी भाजपचे वाभाडे काढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.